औरंगाबाद: शिवसेनेचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्याबाबतचा आदेश  दिला आहे.


न्यायमूर्ती पी.व्ही.नलावडे यांनी हा निर्णय दिला आहे.

विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीवेळी अर्जुन खोतकर यांचा उमेदवारी अर्ज विहित वेळेनंतर भरण्यात आला, असा आक्षेप काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी घेतला होता.

त्यावर औरंगाबादेत सुनावणी सुरु होती.

दरम्यान या निर्णयावर दाद मागण्यासाठी अर्जुन खोतकर यांना कोर्टानं 4 आठवड्यांची मुदत दिली आहे. तोपर्यंत आमदारकी रद्द करण्याचा निर्णय स्थगित असेल.

अर्जुन खोतकर हे 2014 मध्ये जालना विधानसभा मतदारसंघातून केवळ 286 मतांनी विजयी झाले होते.

अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया

दरम्यान, याबाबत राज्यमंत्री अर्जुन खोतक यांनी एबीपी माझाकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

तांत्रिक मुद्द्यावर न्यायालयाने आमदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याबाबत आम्ही सुप्रीम कोर्टात दाद मागू.

27 तारखेला 3 वाजेपर्यंत फॉर्म भरायचे होते. मात्र शेवटच्या दिवशी जो-जो रांगेत असेल, त्या त्या सर्वांचे अर्ज भरुन घेणं आवश्यक असतं. त्यामुळेच तांत्रिक मुद्दा पाहून खंडपीठाने दिलेल्या निर्णयाला मी सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे, तिथे मला दाद मिळेल, असा विश्वास खोतकर यांनी व्यक्त केला.

कैलास गोरंट्याल यांच्या वकिलाचा दावा

जालना विधानसभेच्या निवडणुकीत अर्जुन खोतकर यांनी उमेदवारी अर्ज  3 नंतर दाखल केला. फॉर्ममध्ये त्रुटी होत्या, तरी तो स्वीकारण्यात आला. निवडणूक आयोगाचे रेकॉर्ड पुरावे म्हणून मांडले. त्यावरुन औरंगाबाद खंडपीठाने निर्णय दिला, असं गोरंट्याल यांच्या वकिलाने एबीपी माझाला सांगितलं.

अर्जुन खोतकर सुप्रीम कोर्टात जाणार असतील, तर आम्हीही लढू, अशीही भूमिका त्यांनी जाहीर केली.

कोण आहेत अर्जुन खोतकर?

  • अर्जुन खोतकर हे शिवसेनेचे नेते असून, मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातून आमदार आहेत. जालना मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करतात.

  • 1990, 1995, 2004 आणि 2014 असे एकूण चार वेळा ते आमदार म्हणून निवडून आले. 1999 साली ते महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्री होते.

  • सध्या खोतकर हे महाराष्ट्र सरकारमध्ये वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास या मंत्रालयांचे राज्यमंत्री आहेत.

  • आपल्या आक्रमक आणि मुद्देसूद भाषणासाठी अर्जुन खोतकर ओळखले जातात. शिवसेनेची आक्रमकता त्यांच्या वक्तृत्त्वशैलीतून ठळकपणे दिसून येते.


2014 ची जालना विधानसभेची निवडणूक

जालना विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून अर्जुन खोतकर, काँग्रेसकडून कैलास गोरंट्याल, भाजपकडून अरविंद चव्हाण, बसपाकडून अब्दुल रशीद अशा महत्त्वाच्या उमेदवारांनी निवडणूक लढवली.

शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 296 मतांनी विजय मिळवला. त्यांना 45078 मतं मिळाली. त्यांनी काँग्रेसचे तत्कालिन आमदार कैलास गोरंट्याल यांचा पराभव केला होता. गोरंट्याल यांना 44782 मतं मिळाली होती.

भाजपचे अरविंद चव्हाण 37,591 मते मिळाली, तर बसपा उमेदवार अब्दुल रशीद यांनी 36,350 मते घेऊन चौथ्या क्रमांकावर राहिले.