उस्मानाबाद : ‘अच्छे दिन आले, भाजीचे भाव पडले, बटाटे घ्या 10 रुपये किलो’, असं म्हणत बटाटे विकणाऱ्या भाजीवाल्याला एका तरुणाने मारहाण केली. उस्मानाबादमधील पोलिस लाईनसमोर ही घटना घडली.


प्रकरण काय आहे?

उस्मानाबादमधील पोलिस लाईनसोर शिवाजी नारायणकर हे भाजीवाले रोज भाजी विक्री करतात. मार्केटमध्ये आवक वाढल्याने भाजीपाल्याचे भाव कमी झाले. त्यामुळे ग्राहकांना ‘अच्छे दिन’ आले, असे ओरडत नारायणकर भाजी विकत होते.

काशिनाथ देशमुख या तरुणाला नारायणकर यांचे वाक्य आवडले नाहीत. ‘कसले अच्छे दिन आलेत’ असे म्हणत काशीनाथने नारायणकर यांना दगडाने मारहाण केली.

नारायणकर यांच्या डोक्यात दोन टाके पडले असून, काशीनाथ देशमुखने नारायणकर कुटुंबालाही मारहाण केली.

विशेष म्हणजे, देशमुख पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अपशब्द वापरत होता, याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मारहाण करणारा काशीनाथ देशमुख सध्या फरार आहे.