कर्जमाफी हा शेतकरी संप आणि संघर्ष यात्रेचा विजय : काँग्रेस
एबीपी माझा वेब टीम | 11 Jun 2017 09:00 PM (IST)
मुंबई : शेतकरी कर्जमाफी हा शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आणि विरोधकांनी एकत्र येऊन काढलेल्या संघर्ष यात्रेचा विजय आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. मुंबईत झालेल्या सुकाणू समिती आणि सरकारच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावर अशोक चव्हाण यांनी आपली भूमिका मांडली. दरम्यान सरकारने घेतलेला हा निर्णय अजून तरी केवळ घोषणाच आहे. त्यामुळे कर्जमाफीचा जेव्हा जीआर निघेल तेव्हाच शेतकऱ्यांना खरा दिलासा मिळेल. कारण अजून याबाबतचे काहीही निकष जाहीर करण्यात आलेले नाहीत, असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं. सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये सरकारच्या उच्चाधिकार समितीने सरसकट कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांनाही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे शेतकरी संघटनांनी पुढील आंदोलन तूर्तास स्थगित केलं आहे. कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी 26 जुलै ही डेडलाईन देण्यात आली आहे. संबंधित बातम्या :