अमरावती : खासदार नाना पटोले यांनी भाजपमध्ये राहून विरोध करण्यापेक्षा काँग्रेसमध्ये यावं, अशी जाहीर ऑफर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. ते अमरावतीतील विभागीय जनआक्रोश मेळाव्यात बोलत होते.


“आधी मुख्यमंत्री म्हणत होते, काँग्रेस सरकारवर 302 चा गुन्हा दाखल करा. मात्र आता आम्ही विचारतो सरकारला की, तुमच्यावर का 302 चा गुन्हा दाखल करु नये?”, असा सवाल अशोक चव्हाणांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केला. शिवाय, 8 नोव्हेंबरला नोटाबंदीचा दिवस हा काळा दिवस म्हणून साजरा करणार, अशी माहितीही त्यांनी दिली.

“सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, पण शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. दुसरीकडे शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी संकटात आहेत. राज्य सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेत.”, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर टीका करत काँग्रेसने जनआक्रोश मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. काल चंद्रपुरात जनआक्रोश मेळावा आयोजित करण्यात आला होता. तिथे काँग्रेसमध्येच दोन गट पाहायला मिळाले होते.