चंद्रपूर : विदर्भात भाजपचं ‘फटा पोस्टर निकला झिरो’ अशी अवस्था झाली आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. ते चंद्रपुरात काँग्रेसच्या ‘जनआक्रोश’ मेळाव्यात बोलत होते.


“आम्ही एका रात्रीत कर्जमाफी दिली. मात्र यांचे म्हणजे ‘तारीख पे तारीख’ सुरु आहे. जीआर बदलणे, रोज अटी -शर्ती बदलणे. फडणवीसांना माझा सवाल आहे की, आता तुमच्या सरकारवर 302 चा गुन्हा का दाखल होऊ नये?” असे म्हणत अशोक चव्हाणांनी कर्जमाफीवरुन फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

व्यापारीही आज म्हणतोय की, एक ही भूल, कमल का फुल. राज्यात वारे बदलू लागले आहे, असे म्हणत अशोक चव्हाणांनी सत्ताधाऱ्यांना इशाराही दिला आहे.

काँग्रेसमध्ये फुटीचा आक्रोश

दरम्यान, भाजपवर प्रहार करण्यासाठी काँग्रेसनं जनआक्रोश आंदोलन छेडलं आहे. मात्र विदर्भात जनआक्रोश मेळाव्याच्या निमित्तानं काँग्रेसमधल्या फुटीचा आक्रोश पाहायला मिळाला. कारण चंद्रपुरात अशोक चव्हाण समर्थकांचा विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्त्वाखाली, तर अशोक चव्हाणांवर नाराज मंडळींचा नरेश पुगलियांच्या नेतृत्त्वाखाली मेळावे पार पडले.

वडेट्टीवारांनी चांदा क्लब मैदानावर मेळाव्याचं आयोजन केलं होतं. तर याच मेळाव्यासमोरून काँग्रेसच्या दुसऱ्या गटाची रॅली काढण्यात आली. विदर्भातील काँग्रेसमधल्या फुटीमुळं अनेक नेत्यांनी आजच्या जनआक्रोश मेळाव्याला पाठ दाखवली.