पंढरपूर : यंदाच्या आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेत सामील होण्याचा मान विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते व त्यांच्या पत्नी इंदुमती कोलते यांनी मिळाला. आज मंदिर समिती सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते चिठ्ठी द्वारे मानाच्या वारकऱ्यांची निवड करण्यात आली. कोलते दाम्पत्य मुख्यमंत्र्यांसोबत या महापूजेत सामिल होणार आहे.
 
केशव कोलते हे वर्धा येथील रहिवासी असून 1972 पासून महिन्याची वारी करीत असत . गेल्या 20 वर्षापासून ते विठ्ठल मंदिरात विणेकरी म्हणून सेवा देत आहेत. गेल्या दोन वर्षापासून कोरोना संकटामुळे मंदिर बंद असल्याने दर्शन रांगेतील भविकातून मानाचा वारकरी निवडता ये नसल्याने मंदिरात सेवा देणाऱ्या भविकातून ही निवड केली जाते . आपण केलेली सेवा फळाला आली आणि विठुरायाचे पूजा करण्याचे भाग्य मिळाले अशी भावना कोलते यांनी व्यक्त केली. 

वारकरी संप्रदायाचा सर्वात सोहळा अशी ओळख असलेल्या आषाढी वारीवर यंदाही कोरोनाचे संकट असल्याने सरकारने दहा मानाच्या पालखी सोहळ्यांना पंढरपूरला येण्याची परवानगी दिली आहे. 20 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होणार आहे.

या दहा पालख्यांना परवानगी

 -संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर)- संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी)-  संत सोपान काका महाराज (सासवड)- संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर)- संत तुकाराम महाराज (देहू)- संत नामदेव महाराज (पंढरपूर)- संत एकनाथ महाराज (पैठण)- रुक्मिणी माता (कौडनेपूर-अमरावती)- संत निळोबाराय (पिंपळनेर - पारनेर अहमदनगर)- संत चंगतेश्वर महाराज (सासवड)

कोरोना संकटात सलग दुसऱ्या दिवशी होत असलेल्या आषाढी यात्रेसाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली असून 17 जुलैपासून 25 जुलैपर्यंत पंढरपूर शहरासह शेजारच्या 10 गावात संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे . या संपूर्ण 9 दिवसाच्या कालावधीत पंढरपूर डेपोमधील एसटी बस सेवेसह सर्व खाजगी वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आषाढ शुद्ध अष्टमी अर्थात 17 जुलैच्या दुपारी 2 वाजल्यापासून संचारबंदीला सुरुवात होणार असून हे संचारबंदी 25 जुलै म्हणजे आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या दुपारी चार वाजेपर्यंत राहणार आहे.