Ashadhi Wari 2022 : विठुरायाच्या गळ्यात तुळशीहार आणि वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीमाळ. देव आणि भक्तांचे हे अनोखे नाते गेल्या शेकडो वर्षांपासून चालत आलेले आहे. गळ्यात तुळशीचीमाळ हीच वारकऱ्यांची ओळख असते.   विठुरायाला प्रिय असणाऱ्या तुळशीच्या लाकडापासून ही 108 मण्यांची तुळशीमाळ बनते. मात्र सध्या वारकऱ्यांना खऱ्या तुळशीमाळेऐवजी चायना माळ दिली जात आहे.  वारकरी खऱ्या तुळशीऐवजी चायना माळ घेताना दिसत आहेत. खरी तुळशीमाळ कशी ओळखावी हे वारकरी संप्रदायापुढे सध्या सर्वात मोठे कोडे बनले आहे. 


वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने तुळशीमाळ म्हणजे जगण्याचे अगाध तत्वज्ञान असते याच भावनेतून जसे स्त्रियांची ओळख मंगळसूत्राने होते तसेच वैष्णवांची ओळख या तुळशीमाळेने होते. देवाला तुळशी प्रिय म्हणूनच त्याच औषधी तुळशीच्या लाकडापासून बनविलेली माळ ही वारकऱ्यांचे दैवत असते. पंढरपूरमध्ये ही माळ गळ्यात घालून वारकरी संप्रदायात प्रवेश करता येतो म्हणून या माळेला इथे विशेष महत्व असते. अंगणात तुळसीची पूजा केली जाते.त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र राहते. ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. माणसाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. त्याच प्रमाणे तुळशीची माळ धारण केल्याने पापे नष्ट होतात अशी भागवत धर्मात धारणा आहे. वारकरी संप्रदायाला माळकरी संप्रदाय असेही संबोधले जाते. या संप्रदायामध्ये तुळशीच्या 108 मण्यांची माळ घातल्या खेरीज कोणालाही वारकरी होता येत नाही. तुळशीची माळ घालणे म्हणजे एक नवा आध्यात्मिक जन्म घेणे असे मानले जाते.


शेकडो वर्षांपासून काशीकापडी समाजाचा तुळशीमाळा बनवण्याचा व्यवसाय


पंढरपूरमध्ये शेकडो वर्षांपासून येथील काशीकापडी समाज तुळशीमाळा बनवण्याचा व्यवसाय करत आला आहे. तुळसीच्या लाकडाचे तुकडे राट नावाच्या यंत्रावर कातून त्यांचे मणी बनविण्याची कला या समाजातील लहान लहान मुलांनाही अवगत आहे. हा समाज वर्षभर तुळशीमाळ बनविण्याचा व्यवसाय करीत असतो. पंढरपूरमध्ये चार मोठ्या यात्रा सोबत रोज येणाऱ्या भाविकांच्या देखील माळ घालण्याची संख्या मोठी असल्याने वर्षभर हा समाज माळा बनविण्याचे काम करीत असतो. पंढरपूर बरोबरच आळंदी , देहू , पैठण , मुक्ताईनगर अशा सर्वच संतांच्या गावात जाऊन हा समाज बनविलेल्या माळा विकायचे काम करीत असतो. मंदिर परिसरातील प्रत्येक लहान मोठ्या व्यापाऱ्याकडे या तुळशीच्यामाळा वर्षभर विकल्या जातात. आजही वारकरी संप्रदायाला लागणाऱ्या खऱ्या तुळशीच्या माळा हा काशीकापडी समाज वर्षभर हाताने बनवत असतो. 


तुळशीच्या लाकडाला कातून मणी बनविले जातात 


मुळचा हा समाज आंध्र प्रदेशातील विठ्ठल भक्त म्हणून ओळखला जातो. आपल्या तुळशी माळाचा व्यवसाय पंढरपूरमध्ये चांगला चालेल, देवासोबत वारकऱ्यांची सेवा करायला मिळेल या भावनेतून 300 वर्षांपूर्वी हा समाज येथे स्थानिक झाला. या समाजातील 200 पेक्षा जास्त तरुण सध्या तुळशीच्या माळा बनविण्याचा व्यवसाय करीत असतात.  तुळशीच्या लाकडाला कातून मणी बनविले जातात आणि या मण्यामुळे माळ बनवली जाते. या माळेचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये जप माळ,पाचपट्टी माळ,दोन पट्टी माळ, गोल मण्यांची माळ ,डबलपट्टी ,चंदन माळ ,कातीव माळ या माळेची किमत 25 रुपयापासून  150 रुपयापर्यंत असते. वारकरी संप्रदायात ही तुळशीमाळ देवाच्या पायाला लावून आपल्या गुरु अथवा महाराजांच्या कडून गळ्यात घातली जाते. दरवर्षी शेकडो नवीन तरुण या माळा घालून वारकरी बनतात आणि दरवर्षी वारी करीत असतात. याचमुळे आषाढी यात्राकाळात तुळशीमाळेचे मार्केट वारकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे असल्याने मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग आणि चंद्रभागा वाळवंटात याची मोठ्या प्रमाणात विक्री होते. 


खरी तुळशीमाळ कशी ओळखाल 


याबाबत बोलताना शिवचरण टमटम सांगतात कि हातापासून बनविलेल्या तुळशीच्या लाकडाच्या माळा तयार झाल्यावर त्यांच्या मण्याला लहान होल असते. मात्र कोणत्याही लाकडापासून मशीनवर बनविलेल्या तुळशी माळेच्या मण्याला मोठे होल असते. सर्वसाधारण जुन्या पिढीतील वारकऱ्यांना याची चांगली ओळख असते. मात्र नवीन पिढीतील वारकऱ्यांसाठी खऱ्या तुळशीमाळेची ओळख समजून घेणे गरजेचे असते.