Ashadhi Wari 2022 :   माऊलीच्या भेटीला लाखो वारकरी दरवर्षी उत्सुक असतात. आषाढीला हा भेटीचा उत्साह जरा जास्तच असतो. वारीमध्ये सगळे समान असतात. लहान थोर, गरीब श्रीमंत असा कुठलाही भेदाभेद वारीत नसतो. माऊलीचे भक्त जगभरात आहेत तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात आहेत. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह देखील विठ्ठलाचे कट्टर भक्त आहेत. ते दरवर्षी नियमित आषाढीला पंढरपूरला येत असतात. 


आषाढी एकादशीला अवघा एक दिवस बाकी आहे. पंढरपूरच्या जवळ येताच वारकऱ्यांना विठुरायाच्या भेटीची आस लागते आणि त्यांची पावलं पंढरपुराकडे ओढली जाऊ लागतात. आज पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे. आषाढी यात्रेसाठी पंढरी सजली असून आज संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखींचं पंढरपुरात आगमन होणार आहे. कोरोनामुळे 2 वर्षांनंतर पायी चालत वारकरी पंढरपुरात दाखल होत असल्यानं वारकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे.


माऊलीच्या भेटीला केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातून भाविक पंढरपुरात दाखल होतात. माऊलींच्या भक्तीची आस भल्याभल्यांना लागलेली असते. म्हणूनच 
"हेची व्हावी माझी आस। 
जन्मोजन्मी तुझा दास।।१।। 
पंढरीचा वारकरी ।
वारी चुको नेदी हरी।।२।। 
संत संग सर्वकाळ। 
अखंड प्रेमाचा कल्लोळ।।३।। 
चंद्रभागे स्नान। 
तुका मागे हेचि दान .।।४।।।" असं संतश्रेष्ठ म्हणतात. 


1992 सालापासून दिग्विजय सिंहांची नियमित वारी


दरवर्षी आषाढीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पंढरपूरला महापूजा करतात. मात्र महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यातील एका माजी मुख्यमंत्र्याला देखील विठुरायाची दरवर्षी ओढ लागलेली असते. ते म्हणजे मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह.  दिग्विजय सिंह हे पंढरपूर वारीला दरवर्षी न चुकता येतात. त्यांनी स्वतः ते मुख्यमंत्री असताना ही परंपरा सुरु केली होती. आता मुख्यमंत्री नसले तरी ते दरवर्षी आषाढीला येतात. गेल्या 30 वर्षाहून अधिक काळापासून दिग्विजय सिंह हे दरवर्षी न चुकता पंढरपूरला वारीदरम्यान येतात. 1992 सालापासून ते नियमित वारी करतात. यात दोन तीन वेळा खंड पडला असल्याची माहिती त्यांनीच दिली होती. 


काल नवमीपर्यंत शहरात जवळपास 7 लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल


दोन वर्षानंतर होत असलेली आषाढी यात्रा विक्रमी होत असून काल नवमीपर्यंत शहरात जवळपास 7 लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल झाले होते. एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या निवासाचा प्रश्न कायमच गंभीर असतो. मात्र, काही वर्षांपासून प्रशासनाने चंद्रभागेशेजारी असणाऱ्या 65 एकर जागेवर भक्तिसागर हे निवास क्षेत्र विकसित केले आहे. यंदा रेल्वेच्या ताब्यात असलेले 40 एकराचे क्षेत्र देखील प्रशासनाला मिळाल्याने यंदा 105 एकर जागेत तब्बल 5 लाख भाविकांच्या मोफत निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. आज दुपार पर्यंत जवळपास 4 लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल झाले असून वाटून दिलेल्या प्लॉटवर त्यांनी आपले तंबू उभारले आहेत. या ठिकाणी पिण्याचे आणि वापराचे शुद्ध पाणी, आरोग्य व्यवस्था, स्वच्छतागृहे, वीज, डांबरी रस्ते आणि सुरक्षेसाठी पोलिसांची व्यवस्था केल्याने यंदा प्रथमच या ठिकाणी पाच लाखांपेक्षा जास्त भाविकांना येथे निवासाची सोय झाली आहे.  


महत्वाच्या बातम्या :