नागपूर: बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगाची हवा खाणाऱ्या आसाराम बापूचे अनुयायी, आता संपत्तीसाठी एकमेकांच्या जीवावर उठल्याचं दिसतं आहे. नागपुरातील राहुल जोशी नावाच्या आसाराम भक्तानं त्याच्यावर गोळीबार झाल्याचा दावा करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या हल्ल्याप्रकरणी राहुल जोशीनं पुनीत नावाच्या इसमावर आरोप केले आहेत.


पुनीत हा आसारामचा मुलगा नारायण साईवर झालेल्या हल्ल्यातील फरार आरोपी असल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान, आसाराम बापू तुरूंगात असेपर्यंत त्याची संपत्ती लाटण्यासाठी अनुयायांचा एक गट सक्रीय झाल्याचं जोशी यांनी म्हटलं आहे. आसाराम बापूचे देशभरात 426 आश्रम तर 25 हजार बालसंस्कार केंद्र आहेत

आसाराम बापू नेहमी तुरुंगातच राहावे असे काहीजण प्रयत्न करत आहेत. असा आरोप राहुलने त्याच्या तक्रारीत केला आहे. 'मी त्यांना विरोध करत असल्याने माझ्यावर त्यांनी हल्ला केला.' असंही तक्रारीत म्हटलं आहे. दरम्यान, ज्याठिकाणी राहुलने त्याच्यावर गोळीबार झाल्याचा दावा केला. त्याठिकाणी गोळीचे रिकामे खोल अजूनपर्यंत पोलिसांना साडपलेले नाही. तसेच राहुलने मीडियासमोर येणंही टाळलं आहे.