अलीबाग : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले अर्णब गोस्वामी यांनी मोबाईल फोन वापरल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात खातेनिहाय चौकशी करण्यात येत आहे. अलिबाग येथे न्यायालयीन कोठडीत असताना मोबाईल वापरल्याची शक्यता आहे. अलिबागमधील क्वॉरटांईन सेटंरच्या शाळेत ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.


गेल्या अडीच वर्षांपूर्वी झालेल्या अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी 4 नोव्हेम्बरला अर्णब गोस्वामी, नितीश सारडा आणि हाफिज शेख यांना अटक करण्यात आली होती. तर, या आरोपींना मिळालेल्या न्यायालयीन कोठडीमुळे त्यांना अलिबाग येथील नगरपालिका शाळेतील विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते. याचदरम्यान, न्यायालयीन कोठडीत असताना शुक्रवारी अर्णब गोस्वामी यांनी मोबाईल वापरल्याचे समोर आले आहे. यावेळी अर्णब गोस्वामी हे सोशल मिडियावर लाईव्ह असल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात, अर्णब गोस्वामी यांच्याकडे मोबाईल फोन कसा पोहचला? याची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे.

अर्णब गोस्वामींना तातडीनं कुठलाही दिलासा देऊ शकत नाही : हायकोर्ट


सुरक्षेच्या कारणास्तव अर्णब गोस्वामींची अलिबागहून तळोजा कारागृहात रवानगी


रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सुरक्षेच्या कारणास्तव तळोजा कारागृहात हलविण्यात आले आहे. कारागृह विभागाचे पोलिस महानिरीक्षकांनी याबाबत आदेश दिले असल्याची माहिती अलिबाग जिल्हा कारागृह अधीक्षक यांनी दिली आहे. अर्णब गोस्वामींसह फिरोज शेख आणि नितेश सरडा यांचीही रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. या तिन्ही आरोपींना मागील चार दिवसांपासून अलिबाग नगरपालिका शाळेत कैद्यांसाठी असलेल्या क्वारंटाईन सेंटर मध्ये ठेवण्यात आलं होतं.


अलिबाग येथील कारागृह त्यांच्यासाठी सुरक्षित नसल्याने त्यांना तळोजा कारागृहात हलवण्याची परवानगी न्यायालयाकडे मागण्यात आली होती. परंतु आपल्या वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेऊन कार्यवाही करावी असे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार कारागृह महानिरीक्षकांची (आय जी ) परवानगी घेऊन अर्णब यांच्यासह तिन्ही आरोपींना तळोजा कारागृहात आणलं गेल्याची माहिती अलिबाग कारागृह अधीक्षक ए . टी. पाटील यांनी दिली आहे.


जामीन न मिळाल्याने अर्णब गोस्वामींची तळोजा कारागृहात रवानगी, अर्णबविरोधात जेलबाहेर जोरदार घोषणाबाजी