उस्मानाबादमध्ये मध्यरात्री सैन्यभरती, उच्च पदवीधरांचेही अर्ज
एबीपी माझा वेब टीम | 08 Apr 2018 05:56 PM (IST)
उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे दिवसा कडाक्याचा उन्ह लक्षात घेता, मध्यरात्री या भरतीची प्रक्रिया पार पाडली जात आहे.
उस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये 5 तारखेपासून सैन्यभरती सुरु झाली आहे. विशेष म्हणजे, सैन्यभरतीसाठी आलेले अनेक उमेदवार पदवीधर आहेत. उस्मानाबादमध्ये चार जिल्ह्यांसाठी सैन्य भरती सुरु झाली आहे. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे ही भरती मध्यरात्री सुरु होते आणि पहाटे संपते. जनरल सैनिकांच्या या जागेसाठी अभियंते तरुण, विविध विषयांमधील पदवीधर, दहावी-बारावी झालेले कोवळ्या वयाची मुलं, अशी अहमदनगर, बीड, लातूर अशा जिल्ह्यांच्या कानाकोपऱ्यातून आलेली आहेत. उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे दिवसा कडाक्याचा उन्ह लक्षात घेता, मध्यरात्री या भरतीची प्रक्रिया पार पाडली जात आहे. 5 एप्रिलपासून भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. रोज सुमारे 5 हजार जण भरती प्रक्रियेसाठी हजर असतात, आज 8 तारखी म्हणजे आतापर्यंत सुमारे 25 हजार जण भरती प्रक्रियेसाठी हजेरी लावून गेले आहेत. पाहा स्पेशल रिपोर्ट : कुणी बीएसस्सी केलेला आहे, तर कुणी बीए, तर कुणी अकरावी-बारावी... ते अगदी नुकतेच दहावीतून बाहेर पडलेले सुद्धा तरुण सैन्यात भरतीसाठी आले होते. कुणी म्हणतो, देशाचे संरक्षण करायचे आहे, कुणी म्हणतो सरकारी नोकरी हवीय, कुणी म्हणतो शेतीतून काही मिळत नाही म्हणून नोकरी हवी आहे. एकंदरीत सैन्यभरतीसाठी येणाऱ्या हजारो तरुणांमधील अनेकांच्या चेहऱ्यावर बरोजगारीच्याही छटा लख्खपणे दिसून येतात.