मुंबई आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा-मेनन यांनी शिवसेना नेते आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. प्रीती मेनन यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन अर्जुन खोतकर यांच्यवर अनेक गंभीर आरोप केले.


 

“जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रचंड घोटाळा झाला असून, एपीएमसीमधील बहुतांश गाळे हे खोतकरांच्या नातेवाईक आणि निकटवर्तीयांच्या नावावर आहेत. एकूण 40 व्यक्तींच्या नावावर 250 गाळे आहे” असा आरोप अर्जुन खोतकर यांच्यावर करत प्रीती शर्मा-मेनन यांनी आपला मोर्चा शिवसेनेकडे वळवला आहे.

https://twitter.com/PreetiSMenon/status/765867073100713984

“जालना जिल्ह्यात अर्जुन खोतकर यांची प्रचंड दहशत आहे. म्हणूनच त्यांचे आजपर्यंतचे घोटाळे बाहेर आले नाहीत. खोतकरांविरोधात बोलणाऱ्यांचे खून होतात.”, असा गंभीर आरोपही प्रीती मेनन यांनी केला आहे.

 

अर्जुन खोतकर आणि त्यांचे बंधून संजय खोतकरांची दहशत

“जालना शहरात राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि त्यांचे बंधू संजय खोतकर यांची प्रचंड दहशत आहे. खोतकरांना विरोध करणाऱ्यांचा कशा प्रकारे निर्घृण खून करण्यात येतो याबद्दल बऱ्याच कानगोष्टी शहरात सुरु असतात, परंतु क्वचित एखाद्याच प्रकरणात FIR दाखल होतो. केवळ 2 प्रकरणात केस दाखल झाल्या परंतु चौकशी मात्र हवागुल करण्यात आली. एक आरोप अर्जुन खोतकर यांच्या विरोधात अपक्ष दलित नगरसेविका संगीत खिल्लारे यांच्या खुनाचा तर दुसरा आरोप अर्जुन खोतकर यांचे बंधू संजय खोतकर यांच्या वर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते कैलास गौड यांच्या खुनाचा आहे.”, असा घणाघात ‘आप’कडून करण्यात आला आहे.