मुंबई :  राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या (Corona) कामाला प्रोत्साहन मिळावे  आणि गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त झाली पाहिजे.  गाव कोरोनामुक्त झाले तर त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे यासाठी राज्यात 'कोरोनामुक्त गाव स्पर्धे'चे  आयोजन करण्यात येणार आहे.  या स्पर्धेची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  जनतेशी संवाद साधताना गावाच्या वेशीवरच कोरोनाला रोखलेल्या गावांचा गौरव केला होता. या उपक्रमास आता अधिक चालना देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.  

कोरोनामुक्त गावांना बक्षीसे

  • कोरोनामुक्त गाव स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या 3 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये  आणि 15  लाख याप्रमाणे बक्षीस दिले जाणार.
  • 6 महसुली विभागात प्रत्येकी 3 प्रमाणे राज्यात एकूण 18 बक्षीसे दिली जाणार. यासाठी बक्षीसाची एकुण रक्कम 5 कोटी 40 लाख रुपये असेल.

कोरोनामुक्त गावांना मिळणार विकासकामे

याशिवाय कोरोनामुक्त गाव स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या 3 ग्रामपंचायतींना योजनांमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे.  यामधून प्रत्येक महसूल विभागात पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये व  25  लाख रुपये इतक्या निधीची विकासकामे मंजुर केली जाणार. स्पर्धेत सहभागी गावांचे विविध 22 निकषांवर गुणांकन करण्यात येणार.  या स्पर्धेत राज्यातील सर्व गावांनी सहभागी होऊन आपले गाव लवकरात लवकर कोरोनामुक्त करावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

Special Report | कोरोनाच्या लढाईत बीडच्या कोळवाडीचा आदर्श, गावात एकही कोरोनाबाधित नाही...