अहमदनगर : जनलोकपाल आंदोलनावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची शिष्टाई अखेर निष्फळ ठरली. 23 मार्चच्या आंदोलनावर ठाम असल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितलं. महाजन केवळ मंत्री आहेत. दिल्लीतल्या बॉसच्या हातात सूत्र आहेत. त्यामुळे चर्चा नव्हे, तर ठोस निर्णय घ्या, असं अण्णा म्हणाले.


आंदोलनाला रामलीला मैदानावर परवानगी मिळाल्याने 'चलो दिल्ली'चा नारा अण्णांनी दिला. यावेळी अण्णांनी लोकशाही देशाचा कारभार चार जण पाहत असल्याचा आरोप केला. तर देश हुकूमशाहीकडे कसा वाटचाल करतोय, हे आंदोलनात सांगणार असल्याचं अण्णा म्हणाले.

अधिवेशनात कोणतं विधेयक मांडणार ते अगोदर सांगा, असंही अण्णांनी बजावलं. वेळ कमी पडत असल्यास अधिवेशनाचा कालावधी वाढवा, असंही अण्णांनी सुचवलं. आता केवळ चर्चा नव्हे, तर ठोस निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली. पत्रांना उत्तर देण्यासाठी परदेशी दौर्‍यातून पंतप्रधानांना सवड नसेल किंवा ईगो असेल, असा टोलाही अण्णांनी लगावला.

अण्णांच्या या इशाऱ्यानंतर रामलीला मैदानावर होणाऱ्या मोदी सरकारविरोधातल्या आंदोलनावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.

गिरीश महाजन यांनी एक तास बंद खोलीत अण्णांसोबत चर्चा केली. यावेळी महाजन यांनी अण्णांना आश्वासनाचं एक पत्रही सादर केलं. यावेळी दोन ते तीन वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अण्णांचा संवाद झाला. मात्र अण्णांनी आंदोलनावर ठाम असल्याचं सांगितलं.

या प्रकरणी महाजन यांनी मुख्यमंत्री अण्णांच्या आंदोलन आणि मागण्यांवर गंभीर असल्याचं सांगितलं. मुख्यमंत्री पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधून आहेत. चर्चेला वेळ मिळाल्यास मार्ग निघेल, असं महाजन यांनी सांगितलं. अण्णांच्या मागण्यांची व्याप्ती मोठी असल्याने त्वरित निर्णय घेता येणार नाही. यासाठी अधिवेशनात काही विधेयकं मंजूर करावी लागतील, असंही महाजन यांनी म्हटलंय.

आंदोलनाची तारीख जवळ आल्याने सरकारने आता अण्णांना गोंजारण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तब्बल 43 पत्र लिहिली, मात्र या पत्रांना केराची टोपली दाखवणारं सरकार जेलमध्ये आंदोलनच्या इशाऱ्याने नमल्याचं दिसत आहे.