अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाच्या चौथ्या दिवशी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे. आपल्या जीवाला बरं वाईट झाल्यास जनता पंतप्रधान मोदींनाच जबाबदार धरेल, असं वक्तव्य अण्णांनी केलं आहे. ते राळेगणसिद्धीमध्ये मागील 4 दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. लोकपाल, लोकायुक्तची अंमलबजावणी व्हावी, स्वामीनाथन आयोगानुसार शेतमालाला दीडपट हमीभाव द्यावा, यासह अन्य मागण्यांसाठी 4 दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत.


1 जानेवारीला अण्णांनी मोदींना पाठवलेलं पत्र मिळालं असल्याचं पत्र पंतप्रधान कार्यालयाकडून अण्णांना पाठवण्यात आलं आहे. मात्र, या पत्रात अण्णांच्या मागण्यांच्या पूर्ततेविषयी कुठलाच उल्लेख करण्यात आलेला नाही, तेही अण्णांनी यावेळी आवर्जून सांगितलं.

दरम्यान अण्णा हजारे यांच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस असल्याने राळेगणसिद्धी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत रास्तारोको आंदोलन केले आहे. पारनेर-वाडेगव्हान राज्य मार्गावर राळेगणसिद्धी ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात मोठ्या संख्येने गावातील पुरुषांबरोबर महिला आणि शालेय विद्यार्थी देखील सहभागी झाले आहेत. उपोषणाचा चौथा दिवस असूनही सरकार कुठल्याही उपाययोजना करत नसल्याने सरकारचा निषेध ग्रामस्थांनी केला आहे.

चौथ्या दिवशी अण्णांचे वजन साडे तीन किलोने घटले
राळेगणसिद्धीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. अण्णांच्या वजनात घट झाली असून, साडे तीन किलोने त्यांचं वजन कमी झालं आहे. सरकार अण्णांच्या उपोषणाची दखल घेत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली असून, आता तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्णय ग्रामस्थांनी ग्रामसभेत केला आहे.

तसंच अण्णांच्या समर्थनात ग्रामस्थांनी थाळी नाद आंदोलनही केलं. सरकारला जागं करण्यासाठी थाळी नाद करण्यात आल्याचं नागरिक म्हणाले. यात राळेगणमधील महिला, पुरुषांसह लहान मुलांनीही सहभाग नोंदवला.

दोन दिवसांपेक्षा अधिक काळ उपोषण करणं अण्णांच्या शरीराला शक्य नाही

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. मात्र अण्णांचं वय लक्षात घेता दोन दिवसांच्या वर उपोषण करणं हे त्यांच्या शरीराला शक्य नाही, अशी माहिती अण्णांच्या डॉक्टरांनी दिली होती. लोकपाल आणि लोकायुक्ताची अंमलबजावणी व्हावी शिवाय स्वामिनाथन आयोगाच्या आयोगाच्या शिफारशीप्रमाणे शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा, या मागणीसाठी अण्णांनी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. अण्णांच्या या आंदोलनाला राळेगणसिद्धीतील ग्रामस्थांनी देखील पाठिंबा दिला आहे.

गुरुवारी राळेगणसिद्धी गावात कडकडीत बंद पुकारून सर्व व्यवहार ठप्प करण्यात आला होता. सोबतच कँडल मार्चही काढण्यात आला होतो. तसेच राळेगणसिद्धीतील ग्रामस्थांनी पारनेरच्या तहसीलदारांकडे निवेदनही दिले आहे.  सरकारने अण्णांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या यासाठी सरकारवर दबाव टाकण्यासाठी राळेगणसिद्धी मधील ग्रामस्थ तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

केंद्रात लोकपालचा निर्णय घेण्याची मागणी
राज्यात लोकयुक्ताचा निर्णय झाला असला तरी केंद्रात लोकपालचा निर्णय घेण्याची मागणी करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपल्या उपोषण आंदोलनाला सुरुवात केली आहे. लोकायुक्ताबाबत सरकारनं अधिवेशनाची वाट न पाहता अध्यादेश काढावा, लोकपाल नेमावा तसंच शेतमालाला दीडपट हमीभाव द्यावा यांसारख्या मागण्यांसाठी अण्णा हजारे यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

मुख्यमंत्री आता लोक आयुक्तांच्या कार्यकक्षेत
राज्याच्या लोक आयुक्तांच्या चौकशीच्या कार्यकक्षेत मुख्यमंत्री या पदाचा समावेश करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या  बैठकीत मान्यता देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.  यासोबतच लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त यांच्या नेमणुकीत सर्व समावेशकता आणि पारदर्शकता आणण्यासाठी सुधारणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त अधिनियम-1971 नुसार लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त यांची निर्मिती करण्यात आली. अशी पदे निर्माण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले होते. या अधिनियमाच्या तरतुदीनुसार लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय स्थापित झाले असून 25 ऑक्टोबर 1972 पासून या कार्यालयाच्या कामकाजास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र शासनाने किंवा शासनाच्यावतीने करण्यात आलेल्या किंवा महानगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच शासनाच्या मालकीची किंवा नियंत्रणाखालील महामंडळे, कंपन्या यासारख्या काही प्राधिकारी संस्थातर्फे करण्यात आलेल्या प्रशासकीय कार्यवाही संबंधिच्या जनतेच्या गाऱ्हाण्यांची आणि लाचलुचपत अभिकथनाच्या तक्रारींची चौकशी या अधिनियमाच्या तरतुदीनुसार लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांना करता येते.  मात्र, त्यात मुख्यमंत्री या पदाचा समावेश नव्हता.