विदर्भात धवलक्रांतीसाठी अमूलचा पुढाकार
एबीपी माझा वेब टीम | 15 Jun 2016 01:04 PM (IST)
मुंबई : दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्यांमुळे चर्चेत असलेल्या विदर्भात अमूल समूहातर्फे ४०० कोटींचा डेअरी प्रकल्प उभारला जाईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना दिली. काही दिवसांपूर्वी गडकरींनी गुजरात दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन आणि अमूल कंपनीशी चर्चा केली. विदर्भातील सद्यस्थिती सुधारण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारनं अमूल समूहाकडे काही योजना आणण्याचा आग्रह धरला होता. या पार्श्वभूमीवर अमूलनं ४०० कोटींच्या प्रकल्पासाठी इच्छा दर्शवली असल्याचं गडकरींनी स्पष्ट केलं. मात्र, विदर्भातील नेमक्या कुठल्या जिल्ह्यात हा प्रकल्प सुरु होईल, याचा तपशील अजून मिळू शकला नाही.