मुंबई : अमरावती येथील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे हत्या प्रकरणात (Amravati Murder Case) पीएफआयचा हात असल्याचा संशय एनआयला (NIA) आहे. पीएफआय कनेक्शनचा एनआयएकडून तपास केला जात आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना 12 ऑगस्टपर्यंत एनआयए कस्टडीमध्ये  पाठवले आहे. 


NIA च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान मौलवी मुश्फिकचा संबध पीएफआयशी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या हत्येमागे पीएफआयचा हात असल्याचा संशय एनआयला आहे. त्या दिशेने एनआयने आपला तपास सुरू केला आहे. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड इरफान शेख हा मौलवी मुश्फिक अहमदला आपला आदर्श मानतो. मुश्फिकच्या सांगण्यावरून नुपूर शर्मा यांचे समर्थन करणारी पोस्ट फॉरवर्ड केल्याने  अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. एवढेच नाही तर आरोपींनी हत्येनंतर बिर्याणी पार्टी देखील केली.  हत्येनंतर आयोजित करण्यात आलेल्या 'बिर्याणी पार्टी'मध्ये कोण सहभागी होते याचा देखील एएनआयकडून तपास करण्यात येणार आहे.  मुशफीक अहमद हा मौलवी आहे, तर अब्दुल अरबाज हा एका एनजीओमध्ये ॲम्बुलन्सचा ड्रायव्हर आहे.   या दोन्ही आरोपींनी उमेश कोल्हे हत्याकांडाचा मास्टरमाइंड इरफान खान आणि इतर आरोपींना कोल्हेची हत्या झाल्यानंतर लपवण्यास मदत केली होती.


काय आहे प्रकरण?


नुपूर शर्मा यांचे समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इरफान शेख हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता हे समोर आलं आहे. त्यानंतर आरोपींनी 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली. प्रथमदर्शनी ही हत्त्या लूटपाट करण्याच्या उद्देशाने झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र तपसानंतर अमरावती शहर पोलिसांनी ही हत्या नुपूर शर्मा यांच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळेच झाली असल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्रालयाने कोल्हे यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला आहे