मराठा असल्यानं माझा छळ: अमरावती आयजी
एबीपी माझा वेब टीम | 08 Nov 2016 08:23 AM (IST)
'मराठा असल्याने माझा छळ केला जात असून मी आत्महत्या केल्यास त्याला आपण जबाबदार असाल.' असा मेसेज अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवला आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्या नावाने हा मेसेज पाठवण्यात आल्याने राज्याच्या पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येच्या कथित धमकीसंदर्भात आयजी विठ्ठल जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करण्यात आला. मात्र, दिवसभर त्यांचा मोबाइल बंद होता. आत्महत्येची धमकी देणारा हा संदेश विठ्ठल जाधव यांनी रविवारी रात्री काही पोलीस अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअॅपवर पाठविल्यानंतर तो काहींनी डीजीपींकडे ‘फॉरवर्ड’केला. शिवाय, हा संदेश सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर अमरावती परिक्षेत्रासह राज्याच्या पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी विठ्ठल जाधव यांच्यावर कारवाई देखील होण्याची चर्चा आहे. अमरावतीचे विशेष पोलीस महानिरिक्षक होण्याआधी विठ्ठल जाधव हे नांदेडला पोलीस अधिक्षक होते. ते उस्मानाबादच्या उमरग्याचे रहिवाशी आहेत. त्यांच्या तरुण मुलाचं अपघाती निधन झाल्यानं ते दारुच्या आहारी गेल्याची चर्चा आहे.