महाराष्ट्राचाही श्वास गुदमरला , मुंबई-पुणे-चंद्रपुरात हवा प्रदुषित
एबीपी माझा वेब टीम | 07 Nov 2016 07:14 PM (IST)
मुंबई : गेल्या चार दिवसांपासून वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीकरांचा श्वास गुदमरत आहे. पण प्रदूषणाच्या धोक्याची घंटा महाराष्ट्रातल्या काही शहरांवरही वाजत आहे. त्यामुळे आपण वायू प्रदूषण कमी करण्यासाठी वेळीच पावलं उचलली नाहीत, तर आज दिल्लीकर जे भोगत आहेत ते आपल्याला भोगावं लागू शकतं. दिल्लीकरांचा श्वास प्रदूषणामुळं गुदमरु लागला आहे आणि त्याचा धोका आता तुमच्या-आमच्या दारातही उभा राहू शकतो. कारण मुंबई, पुणे, नाशिक, चंद्रपूर या शहराची हवा मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे. दिल्ली 500 pm (पर्टिक्युलेट मॅटर) मुंबई 166 pm पुणे 148 pm नाशिक 147 pm नागपूर 133 pm 120 PM पेक्षा जास्त प्रदूषण असेल तर ते आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे तुमचं शहर धोक्याची पातळी ओलांडणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. केंद्रीय दळवळणमंत्री नितीन गडकरींनी तर मुंबईकरांसाठी संभाव्य धोका कमी करण्याची विनंतीही केली आहे. दिल्लीच्या अनुभवावरुन मुंबईतही पाणी आणि वायू प्रदूषण कमी होण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे, ही मुख्यमंत्र्यांना विनंती असल्याचं ते म्हणाले. प्रदूषण करण्यात पुणेकरही मागे नाहीत. एकट्या पुण्यात तब्बल 30 लाख दुचाकींची संख्या आहे. त्यामुळे प्रदुषणाची पातळी किती असेल याचा अंदाज येऊ शकतो. नाशिकमध्ये तीच आवस्था आहे. वर्षाला 1 लाख वाहनांची पासिंग होत आहे. त्यामध्ये 65 टक्के टू व्हीलर तर 35 टक्के फोर व्हीलरचा समावेश आहे. शहरातील वाढती ट्राफिक समस्या वायू प्रदूषणाला कारणीभूत आहे.