Maharashtra Rain : हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पाऊस (Rain) पडत आहे. मात्र, कालपासून राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं चांगली हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर, पालघर, नंदूरबार, औरंगाबाद या जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली. अन्य ठिकाणी मात्र, पावसानं उघडीप दिली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाचा अंदाज दिला आहे. आर विदर्भासह मराठवाड्यात पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांना देखील पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.


सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. काही ठिकाणीच हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. मुंबई, ठाणे आणि औरंगाबाद परिसरात मात्र, पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. आज विदर्भातील सर्व जिल्हे तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे आणि सोलापूरमध्येही यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, मागील तीन ते चार दिवसात राज्यात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कलीत देखील झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच वाहतुकीवरही परिणाम झाला होता. 


यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय?


यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर या यलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. हा इशारा वॉचसाठी दिलेला असतो. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्‍हाला तत्‍काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्‍ही ठिकाण आणि तुमच्‍या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असे या अलर्टचा अर्थ आहे.


औरंगाबाद जिल्ह्यात जोरदार पाऊस


औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी पावसानं चांगली हजेरी लावली आहे. कन्नड तालुक्यातील हतनूर परिसरातील शिवना टाकळी प्रकल्प 100 टक्के भरल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. धरणाच्या पाच पैकी एक दरवाजा 10 सेमी उघडला असुन, त्याद्वारे 360 क्युसेक्सने पाणी शिवना नदी पात्रात सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शिवना नदी काठावरील लोकांना पुढे पुराचा धोका लक्षात घेता सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, जायकवाडी धरणातून होणारा पाण्याचा विसर्गही आता कमी करण्यात आला आहे. त्यामुळं 1 लाख 13 हजार क्युसेकने होणारा पाण्याचा विसर्ग आता 80 हजारावर आला आहे. मात्र, असे असताना नदी काठच्या गावांना देण्यात आलेला सतर्कतेचा इशारा कायम आहे. सद्या धरणात 80 हजार 674 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरु आहे.