Amol Mitkari On Shrinivas Pawar  : मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या अजित पवार (Ajit Pawar) विरुद्ध शरद पवार (Sharad Pawar) वादात अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) यांची एन्ट्री झाली आहे. तर,  श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांच्या भूमिकेला विरोध करत शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, यावर आता अजित पवार गटाची देखील प्रतिक्रिया येतांना पाहायला मिळत आहे. तर,  भावाच्या विरोधात भावाला उभं करण्याचा कुटील डाव असून, शरद पवार गट भावनिक वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) केला आहे. 


श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांबद्दल केलेल्या व्यक्तव्यावर बोलतांना अमोल मिटकरी म्हणाले की, "आजपर्यंत श्रीनिवास पवार साहेब राजकीय क्षेत्रात दिसले नाही. ते त्यांचा व्यवसाय सांभाळत होते. पण, काही दिवसांपूर्वी अजितदादांनी भाष्य केलं होतं की, माझ्या परिवारातील काही लोक माझ्यासोबत नसतील, पण बारामतीतील जनता माझं परिवार असेल. श्रीनिवास पवार काटेवाडीमध्ये काल जे काही बोलले, ही जुनीच पद्धत आहे. घरात एकमेकांच्या विरोधात लोकांना उभं करायचं. एकमेकांच्या विरोधात सख्खे भावांना उभे करून, आपण निवडणूक जिंकू असे त्यांना वाटत असेल, तर हा तुमच्या भ्रमाचा भोपळा आहे हे वरिष्ठांनी लक्षात घेतलं पाहिजे. बारामतीची जनता अजित पवारांचं कुटुंब आहे. अजित पवार आतल्या गाठीचे राजकारणी नसून, त्यांना डाव कपट जमत नाही. अजित पवारांच्या विरोधात त्यांच्या सख्ख्या भावाला उभं करण्याचा हा कुटील डाव असल्याचं अमोल मिटकरी म्हणाले. 


भावनिक वातावरणाचा कुठलाही फरक पडणार 


पुढे बोलतांना अमोल मिटकरी म्हणाले की, "आम्ही साहेबांच्या सोबत आहोत असे सांगून तुम्ही भावनिक वातावरण निर्माण करत आहात. मात्र, साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच आजपर्यंत अजित पवार घडले आहे. आतापर्यंत ज्या ज्या घडामोडी घडल्या किंवा 2019 मधील भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय साहेबांचाच होता. 2019 ला भाजपने पाठिंबा न मागता त्यांना शरद पवार पाठिंबा देऊ शकतात आणि आता तीच अधिकृत भूमिका घेतली असेल तर अजित पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात कशासाठी उभा करत आहे. त्याच्यामुळे हे भावनिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या भावनिक वातावरणाचा कुठलाही फरक पडणार नाही. अजित पवारांचा परिवार हा तेवढा पुरता नाही, त्यांच्या आईच्या पोटी आम्ही जन्माला आलो नसलो तरी वैचारिकदृष्टीने आम्ही त्यांच्यासोबत बांधील आहोत. आम्ही रक्ताचं पाणी करू, रात्रीचा दिवस करू, मात्र एवढेच प्रतिष्ठेची जागा तुम्ही करत असाल, तर आम्ही देखील सुनेत्रा पवार यांचा विजय खेचून आणणार असल्याचे मिटकरी म्हणाले. 


त्यांनी अलीकडेच राजकारणात एन्ट्री केली


श्रीनिवास पवार साहेब यांनी अलीकडेच राजकारणात एन्ट्री केली आहे. एवढे दिवस ते का बोलले नाही. सातबारा ज्येष्ठांच्या नावाचा आहे मान्य आहे, पण कर्तुत्व लागत असते. एखादाच्या वडिलाकडे चारशे एकर शेती असेल, तो सातबारा वडिलांच्या नावावर असेल. पण, त्या शेतीची मशागत करणारा त्यासाठी पात्र असेल तरच त्या शेतीला अर्थ आहे. शरद पवारांचा, यशवंतरावांचा वारसा अजित पवारांनी सांभाळला आहे हे श्रीनिवास पवारांनी मान्य केले पाहिजे. असे भावनिक विषय निर्माण करून जाणीवपूर्वक संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्यात कोणतेही अर्थ नाही. जनता हुशार आहे. लोकसभेचे रणांगण जवळ आहे. कुरुक्षेत्रावर अर्जुनाच्या भूमिकेत दादांना राहावं लागेल. मात्र, सारथी ही जनता आहे. मग समोर द्रोणाचार्य असो की आणखी कुणी शकुनी मामा असो त्याचा नीतपात केल्याशिवाय आम्ही राहणार नाही.


इतर महत्वाच्या बातम्या : 


भाऊ म्हणून तुझं सगळं ऐकलं, पण आता नाही, अजित पवारांच्या सख्ख्या भावाने साथ सोडली; घरातून दुसरा मोठा विरोध!