Subhash Desai Reaction : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करून देण्यास महाविकास आघाडी सरकार हतबल असल्याची टीका अमित शाह यांनी पुण्यातील सभेमध्ये केली होती. अमित शाह यांच्या टीकेला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. केंद्राने महाराष्ट्रावर वारंवार अन्याय केल्याची टीका सुभाष देसाई यांनी केली आहे. महाराष्ट्राचं गतवैभव पुन्हा मिळवून द्यायचं असेल तर गुजरातला उद्योग पळवणं थांबवा, असा खोचक टोलाही सुभाष देसाई यांनी अमित शाह यांना लगावलाय.  


कोरोना महामारीच्या काळात राज्यात कोटींची गुंतवणुक आणली आहे. पण महाराष्ट्राचे वैभव पळवून नेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. केद्राकडून वारंवार राज्यावर अन्याय होत आहे. असं वक्तव्य उद्योगमंत्री सभाष देसाई यांनी केलं आहे. मुख्यमंत्री व्यवस्थित आहेत, अधिवेशनातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कारभार सांभाळणार असल्याची माहिती यावेळी सुभाष देसाई यांनी दिली. 


अमित शहा दोन वर्षांनी मुख्यमंत्री पदाबद्दल बोलत आहेत, एवढा उशीर बोलायला? आम्ही वेळोवळो परिस्थितीबद्दल बोलत आलो आहोत, असं वक्तव्य सुभाष देसाई यांनी केलं आहे. सरकार पडत नाहीय याबद्दल अमित शाह आणि भाजपमध्ये नाराजी दिसत आहे. पण वेळ कशाला लावायचा? 2024 ला निवडणुका होणार आहेत, तेव्हा कळेल, असेही देसाई म्हणाले. 


सुभाष देसाई काय म्हणाले? - 
- अमित शहांनी काल राजकीय भाष्य केले होते. राज्याला गतवैभव मिळवून देण्यात राज्य सरकार हतबल ठरतंय, असे ते म्हणाले. पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याचे असलेले वैभव पळवून नेण्याचे काम केंद्राने व गुजरातने थांबवावे
- कोरोना काळात आम्ही २ लाख कोटी रूपये आम्ही आणलेत
- केंद्राकडून नेहमी राज्यावर अन्याय केला जातोय. देवेंद्र फडणवीस यांच्या काळातही पळवापळवी झाले. पण ते गप्प बसले. आम्ही नाही गप्प बसणार
- जागतिक आर्थिक केंद्राचा मान हा मुंबईलाच हवा. कारण आर्थिक केंद्र हे मुंबईतच आहे. पण गिफ्ट त्यांनी गुजरातला सुरू केले. जे चालतच नाही. 
- दत्तोपंत ठेंगडी कामगार शिक्षण संस्था नागपुरात होती, ती दिल्लीला हलवली गेली
- मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याचे सर्व पुरावे देवूनही केंद्र सरकार निर्णय घेत नाही
- २०१४ ते २०२१ पर्यंत केवळ दोन मेडिकल कॉलेज मंजूर. युपीला मात्र २७ मेडिकल कॉलेज मंजूर झाली. याकरता युपीला २७०० कोटी व महाराष्ट्राला फक्त २६३ कोटी दिले गेले
- सर्वात जास्त कोरोना रूग्ण महाराष्ट्रात असतानाही सर्वात कमी रेमडेसिवर दिले गेले 
-६३४० कोटींची जीएसटी थकबाकी केंद्राकडे आहे
- आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र तात्काळ मंजूरी द्या
- तुमच्या आवडीचे सरकार नसले तरी तुमच्या निर्णयांचा फटका जनतेला बसतोय
- मुख्यमंत्री आजारी असल्यानं राज्याच्या कारभारात काही फरक पडलेला नाही. ते कॅबिनेटमध्ये नेहमी असतात
- मुख्यमंत्री अधिवेशनात सहभागी होतील.सोशल मिडियावर काय येतंय ते माहिती नाही
- रामदास कदमांची पक्ष दखल घेईल. ते नेते आहेत. गंभीर मुद्दे असतील तर गंभीर दखलच घेतली जाईल.
 - दोन वर्षांनी ते हे बोलतायत. ही त्यांची निराशा आहे. आणखी ३ वर्षे वाट पहा.नियमांप्रमाणेच तेव्हा मुकाबला आहे. काय होतंय ते पहा
- हिंदुत्वावर संकट येईल तेव्हा हेच लोक शेपूट घालून बसतील
- मी काही त्या पार्टीत नव्हतो...बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय नेहमी.
- आमचे प्रेम तीनचाकीवरच आहे...


उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी विश्वासघात केला - अमित शाह
अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्यांनी विश्वासघात केला, असं विधान केलं. यावेळी अमित शाह यांनी राज्यातील सरकारवर चौफेर टीका केली. शिवसेनेवर निशाणा साधताना 2019 च्या निवडणुकीत भाजपसोबत शिवसेनेनं विश्वासघात केल्याचा आरोपही लगावला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे मातोश्रीवरील बैठकीत ठरलं होतं. मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेनं हिंदुत्व बाजूला ठेवलं आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून 2019 मध्ये भाजपसोबत विश्वासघात केला. सत्तेतून पायउतार व्हा आणि मग मैदानात उतरुन दोन - दोन हात करु. जनता कुणाला कौल देते हे पाहूयात. तिन्ही पक्षाने एकत्र लढून भाजपला हरवून दाखवावे, असं आव्हान केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिलं.