मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बहीण आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबतच्या दुरावलेल्या नात्यावर भावनिक मत मांडलं आहे. या नात्यातला दुरावा कमी करण्यासाठी घरातला मोठा व्यक्ती म्हणून आपले दोन पाऊलं कधीही पुढे असतील, असं ते म्हणाले.


पंकजा मुंडे आणि धनंजय मंडे यांच्यातील विरोध हा महाराष्ट्राला नवा नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते अनेकदा एका व्यासपीठावरही दिसून आले, तर सभागृहात ते एकमेकांच्या आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे एबीपी माझाने धनंजय मुंडेंना याबाबत प्रश्न विचारला.

''नात्यातला दुरावा मिटण्यासाठी दोन्ही बाजूने त्या पद्धतीचा संवाद लागतो. नात्यातला दुरावा मिटावा यासाठी घरातला मोठा व्यक्ती म्हणून माझे दोन पाऊलं कधीही पुढे असेल. तसा संवाद दोन्ही बाजूने हवा. राजकारणात राजकारण त्याच्या ठिकाणी आणि नातं दुसऱ्या ठिकाणी असं असतं. संवाद जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत नात्यामध्ये चांगले संबंध निर्माण होत नाही. स्थानिक पातळीपासून एकमेकांना विरोध आहे. याचा परिणाम नात्यावर होऊ नये असं वाटत होतं. पण परिणाम एवढे झालेत की त्याला काहीही करु शकत नाही,'' असं धनंजय मुंडे म्हणाले.

दरम्यान, आगामी निवडणूक परळीत विधानसभेतूनच लढणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं. याबाबत पक्षश्रेष्ठींना सांगून ठेवलं असल्याचंही ते म्हणाले. 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंचा परळीतून पराभव केला होता.

पाहा व्हिडीओ :