मुंबई : यंदा 19 फेब्रुवारीला साजरी होणारी शिवजयंती सहयाद्री देवराईच्या वतीने अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. यंदा सहयाद्री देवराईचे सदस्य आपल्याजवळ असणाऱ्या गड किल्ल्यावर जाऊन वृक्ष लागवड करणार आहेत. तसेच ज्या ठिकाणी गड किल्ले नाही त्याठिकाणी वृक्ष दिंडी काढण्यात येणार आहे. आणि त्यानंतर मोकळ्या जागेत झाडं लावून त्याचं संगोपन करणार आहेत.


याबाबत बोलताना सहयाद्री देवराईचे प्रमुख अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले की, झाडांची मूळ ओलावा शोधत राहतात. घट्ट होत जातात, तसेच झाडांवर प्रेम करणारे लोक एकमेकांना शोधूनच काढतात. नातं घट्ट होत जातो. सह्याद्री देवराईच्या निमित्ताने आपण एकत्रित आलो आणि बघता बघता महाराष्ट्रात 28 देवराई उभ्या राहिल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत! या शिवसुर्याचा शिवनेरी गडावर जन्म झाला. हा जन्मदिवस महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव म्हणून आपण 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा करत असतो. त्यामुळे शिवरायांना आपल्या जवळील गडकिल्यावर, देवराई मध्ये तसेच जिथे गडकिल्ले नाही तिथे "वृक्षदिंडी" काढून ज्या झाडाची वृक्षदिंडी काढली त्या झाडाच्या नावाने उदा. वडाच्या नावाने चांगभलं म्हणून झाड लावायचे आहे. त्याचे संगोपन करून, दरवर्षी शिवजयंती या जगवलेल्या झाडाच्या वाढदिवसाने साजरी करून "मानवंदना" द्यायची आहे.


या छोट्या परंतु महत्वाच्या उपक्रमाचे फोटो, व्हिडीओची एक चित्रफीत तयार करून पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे व्हिडीओ  मेल आय डी वर पाठवायची आहे. सचिन चंदने- 9028347002, मेल आयडी -sahayadridevrai@gmail.com