अकोला : गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या वडिलांनी कॉलेज कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार उघडकीस येऊन 40 तासापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. मात्र त्यांचे वडील विठ्ठल पाटलांवर अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.


पोलिसांच्या तपासात कोणताही हस्तक्षेप करणार नाही आणि तपासात जे निष्पन्न होईल त्यानुसार कारवाई केली जाईल, असं आश्वासन खरं तर रणजित पाटलांनी दिलं होतं. मात्र अजूनही विठ्ठल पाटलांवर साधा गुन्हाही दाखल झालेला नाही.

वडिलांची कॉलेज कर्मचाऱ्याला श्रीमुखात, रणजीत पाटलांनी मौन सोडलं


मुर्तिजापूर पोलिसांनी अद्याप प्रकरणाचा तपासही केलेला नाही, त्यामुळे पोलिस प्रशासन कसला मुहूर्त शोधत आहे, की गृहराज्यमंत्र्यांच्या पिताश्रींना पाठीशी घातलं जात आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.

रणजीत पाटील काय म्हणाले?


पोलिस तपासात जे निष्पन्न होईल, त्यानुसार आपल्या वडिलांवर कारवाई केली जाईल, यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप करणार नसल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी दिली होती. दरवर्षी अॅडमिशनच्या वेळी हे वाद होतात, वडील तो कारभार पाहतात, त्याच्याशी माझा संबंध नसल्याचं रणजीत पाटील यांनी सांगितलं होतं.

गेल्या 15 ते 20 वर्षांपासून आपल्या आणि संजय देशमुखांच्या संस्थेत वाद असल्याचं रणजीत पाटलांनी मान्य केलं. दरम्यान, पोलिस तपासात कोणताही हस्तक्षेप करणार नाही आणि कायदा त्याचं काम करेल, असं रणजित पाटील म्हणाले.

मुर्तिजापूर तालूक्यातील घुंगशी हे रणजीत पाटील यांचं मूळ गाव आहे. वडील घुंगशी येथेच शेती करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

काय आहे प्रकरण?


गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या वडिलांनी कॉलेज कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील भाऊसाहेब देशमुख या कॉलेजमध्ये हा प्रकार घडला.

देशमुख कुटुंबीयांच्या संस्थेचं हे कॉलेज आहे. रणजीत पाटलांच्या कुटुंबीयांमध्ये आणि देशमुख कुटुंबात 2010 पासून वाद सुरु आहे. मंगरुळतांबे गावात रणजीत पाटलांचं कॉलेज आहे. पण या भाऊसाहेब देशमुख कॉलेजमुळे विद्यार्थी रणजीत पाटलांच्या कॉलेजमध्ये जात नाहीत, असं बोललं जातं.

गृहराज्यमंत्री रणजीत पाटलांच्या वडिलांची कॉलेज कर्मचाऱ्याला मारहाण


दोन्ही कुटुंबांमध्ये 2010 पासून कायदेशीर लढाई सुरु आहे. रणजीत पाटलांचे वडील आणि दोन वेळा आमदार राहिलेले विठ्ठल पाटील यांनी 2013 साली या कॉलेजची मान्यता रद्द करण्याची मागणी केली होती.

या कॉलेजची मान्यता रद्द करण्यात आली. मात्र देशमुख कुटुंबीयांनी पुन्हा मान्यता मिळवली. आता पुन्हा या कॉलेजची मान्यता रद्द करण्यात आली आहे. पण तरीही कॉलेज सुरु असल्यामुळे विठ्ठल पाटील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन कॉलेजमध्ये गेले. यावेळी कॉलेजच्या शिपायाला त्यांनी मारहाण केली. शिवाय शिवीगाळही केली.

मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणी विठ्ठल पाटील यांच्याविरोधात मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र दोन वेळा आमदार राहिलेल्या विठ्ठल पाटील यांना कॉलेज कर्मचाऱ्याला मारहाण करणं शोभतं का, असा सवाल केला जात आहे.