मुंबई :  सिंचन घोटाळ्याला अजित पवार जबाबदार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) न्यायालयासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. परंतु विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मात्र अजित पवार यांची पाठराखण केली आहे. मुंडे म्हणाले की, एसीबीने सादर केलेल्या शपथपत्राचा चुकीचा अर्थ घेतला जात आहे.


धनंजय मुंडे म्हणाले की, "शपथपत्रात कुठेही अजित पवार यांच्यावर ठपका ठेवलेला नाही. शपथपत्राचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. अजित दादांनी कधीही अधिकार किंवा नियम डावलून मंजुरी दिली नाही. सचिवांनी ज्या फाईल पवारांसमोर ठेवल्या त्यावर त्यांनी सह्या केल्या, या प्रकरणाला मंत्री जबाबदार नाहीत."

मुंडे एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी याप्रकरणी माध्यमांनादेखील दोषी ठरवले आहे. ते म्हणाले की, "माध्यमांनीदेखील प्रतिज्ञापत्राचा चुकीचा अर्थ काढला आहे. मागच्या वेळीदेखील मीडियाने दाखवले की, तटकरे आणि अजित पवार यांचे नाव सिंचन घोटाळ्यात आहे. त्यामुळे माध्यमांना विनंती करतो की प्रतिज्ञापत्र नीट वाचायला हवे. विरोधक आक्रमक झाल्यामुळे सरकार हे राजकारण करत आहे."

अजित पवारांवर कोणते आरोप आहेत?
सिंचन प्रकल्पाचा निधी वाढवणे, नियमांचा भंग करणे, असा ठपका अजित पवारांवर ठेवण्यात आला आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 27 पानांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यामध्ये अजित पवार हे सिंचन घोटाळ्यासाठी जबाबदार असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. ठेका देण्याचे पूर्वनियोजित षड:यंत्र रचणे, प्रकल्पाची किंमत वाढवणे, नियमांचे उल्लंघन करणे, राज्याला प्रचंड नुकसान पोहचवणे असा ठपका एसीबीने अजित पवारांवर ठेवण्यात आला आहे.

वाचा : सिंचन घोटाळ्यासाठी अजित पवार जबाबदार, एसीबीचं प्रतिज्ञापत्र

         : सिंचन घोटाळा : सरकारची कारवाई सूडबुद्धीने नाही तर नियमाने : महाजन