उस्मानाबाद : ‘राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आणा मी तुम्हाला वचन देतो राज्यातील माझ्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देईन. नाहीतर मी पवारांची औलाद सांगणार नाही.’ असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं आहे. ते आज (बुधवार) उस्मानाबादमधील भूमच्या जाहीर सभेत बोलत होते.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल यात्रेचा आज दुसरा दिवस होता आणि भूम येथे ही जाहीर सभा पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसनं तुळजापूरच्या भवानी मातेचं दर्शन घेऊन हल्लाबोल यात्रेला सुरुवात केली आहे.

‘या सरकारने अजूनपर्यंत कर्जमाफी दिलेली नाही. त्यासाठी इच्छाशक्तीची गरज असते. या सरकारच्या कार्यकाळात शेतकरी पहिल्यांदाच संपावर गेला. या सरकारचे प्रतिनिधी कर्जमाफी करण्यासंदर्भात पवार साहेबांचा सल्ला घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी पवार साहेबांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा असे सांगितले होते. मात्र, त्यांनी आपल्या निर्णयामध्ये बदल केले. हे सरकार प्रत्येक गोष्टीमध्ये भेदभाव करताना दिसत आहे.’ असा आरोप अजित पवार यांनी केला.

‘आज कुठल्याही निवडणुका नाहीत परंतु आपण एकत्र आलो आहोत. आपला शेतकरी मोडला तर राज्य उद्ध्वस्त होईल. त्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हल्लाबोल आंदोलन सुरु केलं आहे.’ असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, पवारांच्या या टीकेला भाजप नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

VIDEO :