मुंबई : शिवसेनेला लोकांची सहानुभूतीही हवीय आणि सरकारची उबही हवीय. जनतेत काम करायचंय, तर सरकार सोडून बाहेर या. मात्र ते त्यांना जमत नाही. त्यांचं वागणं दोन तोंडी गांडुळासारखं झालंय, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली. बारामतीत दिवाळीनिमित्त त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या, त्यानंतर ते बोलत होते.


"दोन तोंडी गांडुळासारखं सेनेचं वागणं"

"शिवसेनेची अवस्था धरलं तर चावतंय अन् सोडलं तर पळतंय, अशी झालीय. एकीकडे ते लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी आंदोलनं करतात आणि दुसरीकडे सरकारची जी उब यांना मिळते, ती उबही त्यांना सोडेनाशी झालीय. तुम्हाला जनतेतच काम करायचंय, तर सरकार सोडून बाहेर या. परंतु, यांना बाहेर पण यायचं नाही. त्या दोन तोंडी गांडूळासारखं वागणं त्यांचं झालंय.", अशी टीका अजित पवारांनी केली.

"काय करायचंय, हेच शिवसेनेला कळत नाही"

"शिवसेनेचा डबल गेम चाललेला आहे. लोक काय इतकी दुधखुळी नाहीत. तुम्ही सरकारमध्ये आहात, तर तुम्हाला आंदोलनाची काय गरज आहे? सरकारमध्ये असलेल्या लोकांनी धोरणं ठरवायची आणि राबवायची असतात. आंदोलनं करायची नसतात. आंदोलनं ही जनता करत असते. जनता एखाद्या विषयाला त्रासली, एखादा विषय जनतेच्या विरोधात गेला किंवा विरोधी पक्षाचे जे आमदार असतात, कार्यकर्ते असतात किंवा सामाजिक संस्थेमध्ये काम करत असणारी लोक असतात, ते आंदोलन करत असतात. शिवसेनेला नक्की कळतच नाही की, नक्की आपण काय करावं?", असे अजित पवार म्हणाले.

"सरकारच्या नाकर्तेपणामुळे एसटी संपावर तोडगा नाही"

"सरकारच्या नाकर्तेपणामुळे एसटी संपावर तोडगा निघाला नाही. संप मिटला असता तर प्रवाशांची, आंदोलकांची दिवाळी चांगली साजरी झाली असती. महाराष्ट्रात पहिल्यांदाच दिवाळीत अशी सर्वसामान्यांची गौरसोय झाली आहे. समाधानकारक तोडगा सरकार काढू शकले नाही, हे सरकारचे अपयश आहे. दिवाळीच्या तोंडावर अनेकांना त्रास झाल्याने सर्वांचा हिरमोड होतो आहे.", असे म्हणत अजित पवारांनी एसटी संपावरुन सरकारवर निशाणा साधला.