नागपूर : 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडकोच्या व्यवहारांना स्थगिती दिली याचाच अर्थ त्यात नक्कीच काहीतरी काळबेरं आहे, अस वक्तव्य राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी केलं. सिडको जमीन प्रकरणाची आणखीन काही कागदपत्रे आमच्या हाती लागली आहेत. हा विषय लवकरच आम्ही अधिवेशनात मांडणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.


मागील आठवड्यातच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणास स्थगिती देत त्यांनी विधानसभेत या प्रकरणाचा खुलासा केला. “सिडको जमीन प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल. त्या अनुषंगाने या संपूर्ण व्यवहाराला स्थगिती देण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात आलं आहे. या जमिनीची विक्री होणार नाही याची खबरदारी घ्यावी. त्याचप्रमाणे महसूल विभागामार्फत कळवण्यात आलं आहे की कोणताही थर्ड पार्टी इंटरेस्ट निर्माण होऊ नये, याबाबतची घबरदारी घेण्यात येईल. जोपर्यंत न्यायलयीन चौकशी होऊन अहवाल येत नाही, तोपर्यंत यासंबंधी कोणतीही कारवाई, जसे विक्री, हस्तांतरण, भाड्याने देणं या सर्वांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे”

सिडको जमीन प्रकरणी काँग्रेसचे आरोप

नवी मुंबईतील सिडकोच्या 24 एकर जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला. कोयना प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेली १७६७ कोटी रुपयांची जमीन बांधकाम व्यावसायिक मनिष भतीजा यांना अवघ्या साडेतीन कोटी रुपयांत विकण्यात आली. हा व्यवहार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील नगरविकास खाते, सिडको आणि भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या संगनमतानं झाल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे.

अधिवेशनाचा दुसऱ्या आठवडा

आज अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील पहिला दिवस आहे. हिवाळी सोडून पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्यामागचा उद्देश काय होता, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. "विदर्भाला न्याय द्यायचा आहे तर डिसेंबरमध्ये महिनाभर अधिवेशन नागपुरात घ्यायचं होतं, पावसाळ्याची कोणतीही तयारी नसताना अधिवेशन डोक्यावर मारलं," अशीही टीकाही त्यांनी केली'. नागपुरमध्ये पावसाचा फटका विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनालाही बसला होता. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच वीज गेल्याने विधीमंडळाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं होतं. यावरुनच नागपूर किंवा मुंबई महापालिकेत सरकारचं अपयश दिसून येत असल्याचेही अजित पवार म्हणाले.

अजित पवारांची संभाजी भिडे वर टीका

संभाजी भिडेंनी केलेल्या वक्तव्याची कीव करावीशी वाटते. मनूने सांगितलेला विचार चुकीचा आहे हे महात्मा फुले, आंबेडकर यांनी सांगितल्याचे अजित पवारांनी सांगितले. आता या विचारसरणीसोबत जायचं की नाही ते बहुजनांनी ठरवायचं असे पवार म्हणाले.