शिर्डी : मित्रांनी खोटे आरोप केल्यामुळे 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे. अहमदनगरमधील राहुरीत ही घटना घडली असून सहा जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


चूक नसताना मित्रांनी खोटे आरोप केल्यामुळे मनोज ससाणे व्यथित झाला होता. त्यामुळे मुळा धरणात उडी घेऊन त्याने आत्महत्या केली. मनोजने सुसाईड नोट लिहिलेली नसली, तरी आत्महत्येपूर्वी त्याने व्हॉट्सअॅप स्टोरीमध्ये आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.

'खऱ्याची दुनिया नाही आज कळलं, ज्या लोकांची मी मन दुखावली असेल त्यांची मी माफी मागतो आणि इथेच थांबतो, आयुष्याचा शेवट करतोय' असे स्टेटस मनोजने पोस्ट केले होते. मित्रांनी केलेल्या नेमक्या कोणत्या आरोपांमुळे मनोज नाराज होता, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

या प्रकरणी कलम 306 अन्वये मनोजच्या सहा मित्रांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.