अहमदनगर : अवघ्या काहीशे रुपयांच्या थकबाकीमुळे अहमदनगरमधील कर्जत तालुक्यात दोघा जणांवर सरपंच आणि उपसरपंच पद गमावण्याची नामुष्की ओढवली.


कर्जत तालुक्यातील बेनवडी गावच्या सरपंच मंदा धुमाळ आणि उपसरपंच मच्छिंद्र गायकवाड यांना आपलं पद गमवावं लागलं. सरपंच धुमाळ यांच्याकडे एक हजार 400 रुपये, तर उपसरपंच गायकवाड यांच्याकडे 725 रुपये थकबाकी होती.

या प्रकरणी सदस्य गणेश गदादे यांच्यासह इतर सदस्यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यानुसार तक्रारीत तथ्य आढळल्यामुळे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी सरपंच आणि उपसरपंच पद रद्द करण्याचा आदेश दिला.

ग्रामपंचायत अधिनियमानं एखाद्या सदस्यानं ग्रामपंचायत कराची थकबाकी किंवा थकबाकीची नोटीस बजावण्यात आल्यावर तीन महिन्यात भरणा करणं गरजेचं आहे. मात्र बेनवडी ग्रामपंचायत ग्रामसेवकांनी नोटीस बजावूनही सरपंच आणि उपसरपंच यांनी पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला.

बेनवडीची निवडणूक 2015 ते 2020 या कालावधीसाठी पार पडली होती. निवडणुकीपासून त्यांच्याकडे पदभार असून त्यांनी घरपट्टी थकवली होती.