अहमदनगर : अहमदनगरच्या निंबोडी गावात जिल्हा परिषदेच्या शाळेचं छत कोसळून 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी संध्याकाळी या शाळेचं छत कोसळल्यानं 20 ते 25 विद्यार्थी जखमीही झाले आहेत.


गेल्या दोन दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलं आहे. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शाळेची जीर्ण झालेली इमारत कोसळली. या दुर्घटनेत श्रेयस रहाणे, वैशाली पोटे, आणि सुनील भिंगारदिवे या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर 20 ते 25 विद्यार्थी जखमी झाले आहेत.

दरम्यान, जखमी विद्यार्थ्यांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर घटनास्थळी प्रशासनाकडून राडारोडा हटवण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं. मात्र, संततधार पावसामुळे प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.