Agriculture News : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात गेल्या पंचवीस दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची (Farmers) पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. मात्र, दुष्काळात तेरावा महिना म्हणावा तशी गत शेतकऱ्यांची झाली आहे. समाधानकारक पाऊस झाला नसल्यानं  विहीर आणि बोरवेलची पाणी पातळी खालवली आहे. अशातच महावितरणकडून लोड शेडिंग सुरु करण्यात आलं आहे.  अपूर्ण होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळं शेतकऱ्यांना उपलब्ध असलेलं पाणीही पिकांना देता येत नाही. 


ग्रामीण भागात शेतीसाठी अवघा आठ तास विद्युत पुरवठा विद्युत वितरण कंपनीकडून केला जात असतो. मात्र, त्यातही तो व्यवस्थित मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवघ्या दोन ते चार तास विद्युत पुरवठा विद्युत वितरण कंपनीकडून केला जात आहे. अनियमित विद्युत पुरवठ्यामुळं पाणी असूनही अनेक शेतकरी पिकांना वाचवू शकत नसल्याची स्थिती नंदुरबार जिल्ह्यात दिसून येत आहे. 


महाराष्ट्रावर लोडशेडिंगचे संकट


राज्यात मोठ्या प्रमाणात पावसाची तूट पाहायला मिळत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कमी पडलेला पाऊस आणि वीजेची वाढलेला मागणी याचा फटका आता राज्याला बसत आहे. लोडशेडिंगचे संकट घोंघावत आहे. महाराष्ट्राला आता लोडशेडिंगचा फटका बसणार असून, मागणी वाढल्यानं आणि तुटवडा निर्माण झाल्यानं महाराष्ट्रात इमर्जन्सी लोडशेडिंग करण्यात येत आहे. त्यामुळं राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी आता रोज लोड शेडिंगला सामोरं जावं लागत आहे. 


पावसाअभावी उभी पिकं हातची जाण्याची वेळ


राज्यात यंदा पावसाने दडी मारल्याचं दिसून आलं. त्यामुळे शेतीसाठी शेतकऱ्यांनी पाण्याचा उपसा वाढला आहे. याचा परिणाम हा विजेचा तुटवडा निर्माण होण्यावर होत आहे. त्यामुळे आपत्कालीन लोडशेडिंग करण्यात येत आहे. विजेची मागणी जशी वाढेल त्यानुसार हा लोडशेडिंग करण्यात येत आहे. कधी एक तास तर कधी दोन तासांपर्यंत लोडशेडिंग करण्यात येत आहे. वाढीव मागणी कमी झाली किंवा पाऊस पडल्यास आल्यास लोडशेडिंग आपोआप बंद होईल असं महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. एका महिन्यापासून पावसानं दडी मारली आहे. पावसाअभावी उभी पिकं हातची जाण्याची वेळ आली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही पिकांना विहिरीतील पाण्यावर जगवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत होत नाही. याबरोबरच महावितरणकडून आवश्यक साहित्याचा पुरवठा केला जात नाही. एकीकडे कमी पडलेल्या पावसामुळे शेतकरी चिंतेत आहे तर दुसरीकडे महावितरणकडून त्यांना वीज पुरवठा नीट होत नसल्याने काळजी वाढली आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Load Shedding : महाराष्ट्रासमोर लोडशेडिंगचं संकट, वीजपुरवठ्याचा तुटवडा; मागणी वाढल्याने महाराष्ट्रात इमर्जन्सी लोडशेडिंग