कोल्हापूर : कोल्हापुरातल्या महापुरानंतर आता राज्य सरकारकडून कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील पंचगंगा नदीची पूररेषा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नगररचना विभागाला पूरबाधित क्षेत्रात नव्याने बांधकामाला परवानगी देऊ नका असे आदेश  दिले आहेत. कोल्हापूरच्या पूरबाधीत क्षेत्रात सध्या काही बांधकामे सुरु आहेत, त्या बांधकामांवरही आता निर्बंध घालण्यात आले आहेत. पूररेषेच्या आत अनेक अनधिकृत बांधकाम झाली आहेत. त्यामुळे महापुराची स्थिती निर्माण झाल्याचं अनेक तज्ज्ञांचं मत आहे.


राज्य सरकारकडून महापालिका क्षेत्रातील पंचगंगा नदीच्या पूररेषा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या पुरामुळे नागरी वस्तीमध्ये निर्माण झालेली परिस्थिती पाहता पूररेषा निश्चित होईपर्यंत पूरबाधित क्षेत्रात नव्याने बांधकाम परवानगी देऊ नका, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नगररचना विभागाला दिले आहेत. या क्षेत्रात सध्या बांधकामे सुरू आहेत. त्यांनाही रेषा निश्चित होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत.

या महापुरामुळे सांगलीत 3 लाख 5 हजार 957 व्यक्ती स्थलांतरीत झाल्या आहेत. 104 गावे आणि महानगरपालिका क्षेत्रामधून 64 हजार 646 कुटुंबे स्थलांतरीत झाली असून दुदैवानं आत्तापर्यंत एकूण 26 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर कोल्हापुरात 2 लाख 45 हजार 229 जणांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या पुरामुळे सांगली, कोल्हापूर आणि साता-यात एकूण 50 गाई, 42 म्हशी, 23 वासरं, 58 शेळ्या आणि 11 हजार 100 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी या याचिकेतून सादर करण्यात आली आहे.