अहमदनगर : राज्यात सुरु असलेले मराठा समाजाचे मोर्चे कौतुकास्पद असल्याचं मत ज्येष्ठ वकिल उज्ज्वल निकम यांनी संगमनेरमध्ये व्यक्त केलं. मराठा मोर्चे शांततामय मार्गाने निघत आहेत, तसंच राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान होणार नाही याचीही खबरदारी घेण्यात आली आहे. ही बाब कौतुकास्पद असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.


मराठ्यांचा मूक मोर्चा हा आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अत्यंत चांगला मार्ग आहे. यापूर्वीच्या अनेक मोर्चांदरम्यान पोलीस यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण येतो तसंच राष्ट्रीय संपत्तीचं नुकसानही केलं जातं. मराठ्यांचे आजचे मोर्चे हे आदर्श मॉडेल आहेत, अशा शब्दात उज्ज्वल निकम यांनी मोर्चांच कौतुक केलं .

प्रसारमाध्यमांवर नियंत्रण गरजेचं

सोशल मीडियाला नियंत्रीत करण्यासाठी व्यापक कायद्याची गरज आहे. प्रसार माध्यमे लोकशाहीचं प्रमुख अंग आहेत, पण अनियंत्रीत स्वातंत्र्य माध्यमांसाठी धोकादायक आहे. तसंच प्रसारमाध्यमांमधील भडकपणाही घातक आहे. माध्यमांनी समाजातील नकारात्मकतेपेक्षा सकारात्मक गोष्टींना प्राधान्य देण्याची गरज असल्याचं निकम म्हणाले.

दहशतवादाला लढाई हे उत्तर नाही

दहशतवादाला लढाई हे उत्तर नाही, त्यामुळे पाकिस्तानला एकाकी टाकणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे. कसाब आणि हेडलीच्या प्रकरणांमधून पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचं सिद्ध झालं आहे. भारताविरुद्ध वातावरण तयार करुन तसंच दहशतवादाला बळ देऊन पुन्हा सत्ता मिळवणं हेच पाकिस्तानी नेत्यांचं ध्येय असल्याचंही उज्ज्वल निकम म्हणाले.