उस्मानाबाद : एबीपी माझाच्या सावकार विरोधी मोहिमेमुळ तीन शेतकऱ्यांच्या घरी दिवाळी नंतर दिवाळी साजरी झाली. सावकाराने व्याजाच्या बदल्यात हडप केलेली 3 शेतकरी कुटुंबाची पाच एकर जमीन प्रशासनाने परत दिली.


एबीपी माझाच्या मोहिमेनंतर जागे झालेल्या प्रशासनाने जमिनीची कागदपत्रे परत केली. या शेतकऱ्यांच्या जमिनी अवैध सावकारने व्याजाच्या बदल्यात हड़प केल्या होत्या. व्याजाने दिलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम वसूल करूनही पिळवणुक सुरुच होती.

एबीपी माझाच्या मोहिमेनंतर पोलिस अधिक्षक कार्यालयात हेल्पलाईन सुरू झाली होती. त्यावर शेतकरी तक्रारी नोंदवत होते. हेल्पलाईनवर दाखल झालेल्या आणखी 22 प्रकरणात येत्या 15 दिवसात निकाल अपेक्षीत आहे. कळंब तालुक्यातील बाभळगाव येथील सारिका रमेश वाघमारे, बाळासाहेब आत्माराम टेकाळे व पुरुषोत्तम रतनलाल तापडे अणि बार्शी येथील विनोद गोविंद भानुशाली या 4 खासगी सावकार यांनी गोरगरीब शेतकऱ्यांना लूटल्याचे सिद्ध जाल्याने सहकार विभागाने त्यांच्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली असुन लवकरच त्यांच्यावर पोलिसात गुन्हे नोंद करण्यात येणार आहेत.

फक्त 16 हजारांच्या बदल्यात 41 हजार रूपये घेऊनही एका शेतकऱ्यांची जमीन हडप केली होती. जमीन परत दिल्याने शेतकरी आनंदित झाले असुन त्यांनी मिठाई वाटून आनंद उत्सव साजरा केला.