यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील शेतकरी कुटुंबातील आदित्याविक्रम मोहन हिराणी यांनी 2016 मध्ये घेतलेल्या यूपीएससी परीक्षेत खणखणीत यश मिळवलं आहे. देशातून 113व्या क्रमांक त्यानं मिळविला आहे. तर महाराष्ट्रातून तो 7व्या क्रमाकावर आहे. या दैदिप्यमान यशामुळे त्याच्यावर व त्याच्या कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


सुरुवातीला शेती सोबत दालमिलचा व्यवसाय असणारे मोहन हिरालाल हिराणी हे सध्या वणी येथे शेती करतात. आदित्याविक्रमचे चौथ्या वर्गापर्यतचे शिक्षण वणीत झाल्यानंतर वरोरा येथून दहावीत असताना तो गुणवत्ता यादीत झळकला होता. राजस्थान मधील बिटस पिलानी महाविद्यालयातून अभियंत्याची पदवी मिळविल्यानंतर दिल्ली येथे राहून त्यांनी यूपीएससीची तयारी केली 2014 मध्ये त्यांनी दिलेल्या पहिल्याच परीक्षेत 1344वा क्रमांक प्राप्त केल्यामुळे त्यांला रक्षा विभागात सहाय्यक संचालक पदावर नियुक्ती मिळाली.

या नियुक्तीवर समाधानी न झालेल्या आदित्याविक्रमनं अधिक मेहनत करून 2016 मध्ये दिलेल्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं. वणी तालुक्यातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी होणारा दुसरा यशवंत ठरला आहे.