Aditya Thackeray: ''सर्वोच्च न्यायालयात धनुष्यबाण आणि पक्ष नावासंदर्भात गांभीर्याने सुनावणी सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून जो निर्णय आला त्याला आम्ही चॅलेंज केला आहे. आम्हाला वाटतं इलेक्शन कमिशन कॉम्प्रोमाइज झालेला आहे. ही लढाई फक्त आता शिवसेनेची नाही तर संविधानाला सुरक्षित ठेवण्यासाठी हा निकाल महत्त्वाचा आहे. लोकशाहीला सुरक्षित ठेवण्यासाठी हा निकाल महत्त्वाचा आहे'', असं ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले आहेत. राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आज या आठवड्यातील सलग दुसरा दिवस होता. यावर आपली प्रतिक्रिया देताना ते असं म्हणाले आहेत. 


Aditya Thackeray on Sanjay Shirsat : आमदार संजय शिरसाट यांच्या आरोपावर आदित्य ठाकरे काय म्हणाले?


शिवसेनेचा (Shiv Sena) निधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दुसऱ्या खात्यात वळवला, असा आरोप शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. यावर बोलताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले आहेत की, ''जे गद्दार आहे त्यांच्याकडे मी काडीमात्र लक्ष देत नाही, त्यांच्या पक्षसुद्धा त्यांच्याकडे लक्ष देत नाही. चोरीचा माल घेऊन कोणी श्रीमंतच्या लिस्टमध्ये आलेले नाही. त्यांनी नाव पक्ष सगळे चोरू द्या, पण गद्दारीचा शिक्का तसाच राहील.''


शिंदे गट आता ठाकरे गटाच्या आमदारांवर व्हिप लागू करू शकतो, अशी चर्चा सुरू होती. मात्र आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टात शिंदे गटाच्या वकिलांनी पुढील सुनावणीपर्यंत असं केलं जाणार नसल्याचं आश्वासन दिलं आहे.  यावर बोलताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाल की, ''व्हिप ही पूर्णपणे वेगळी गोष्ट झाली, आमची लढाई लोकशाहीसाठी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आम्ही अजूनही मित्रच आहोत. सरकार असताना सुद्धा आम्ही कधीही सूडबुद्धीने वागलो नाही.''


Aditya Thackeray: 'मुंबईसाठी आम्ही लढत राहू'


बीएमसी प्रकल्प रद्द केले जास्त असल्यावरून आदित्य ठाकरे म्हणाले की, ''मुंबईकरांसाठी आम्ही जे खर्च करत होतो, डेव्हलपमेंट फंड आणत होतो. यांचा डोळा फिक्स डिपॉझिटवर आहे. जेणेकरून ते खर्च करतील आणि दिल्लीश्वरांसमोर झुकवतील. आम्ही जे प्रकल्प राबवणार होतो, ते रद्द करून स्वतःच्या दावोस दौऱ्यावर चाळीस कोटी रुपये 28 तासात खर्च केले. मुंबईकरांसाठीचा पैसा वळवायचा आहे आणि आपल्या तिजोरीत जमा करायचा आहे.''