नागपूर : बलात्कार पीडितेला त्वरित न्याय मिळवून देऊ असे दावे बलात्काराच्या प्रत्येक प्रकरणानंतर केले जातात. मात्र, प्रत्यक्षात ज्या पोलिस यंत्रणेवर पीडितेला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असते. तीच यंत्रणा पीडितेचा छळ करते. नागपूरची अशीच एक निर्भया गेले दोन महीने न्यायासाठी संघर्ष करत आहे. मात्र, पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाची हिम्मत एवढी वाढली आहे की काल भर बाजारात त्याने पाठविलेल्या गुंडानी तिच्या कानशिलात बंदूक ठेऊन जिवंत राहायचे असल्यास तक्रार मागे घे अशी धमकी दिली.


 

पितृछत्र आधीच हरपलेली नागपूरच्या निर्भयावर मित्राकडून अत्याचार झाल्यानंतर ही मनोरुग्ण आई आणि अल्पवयीन भावाची सांभाळ करत न्यायासाठी लढत आहे. मैत्री ठेऊन लग्नाचे आश्वासन देणाऱ्या पराग राऊत नावाच्या युवकाने 28 मे रोजी नशेत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर एकाएकी संबंध तोडले.

 

परागचे कुटुंब पीडितेला ओळखत असल्याने तिने नागभीडला त्यांच्या घरी जाऊन सर्व प्रकार सांगितला. मात्र, आमची पूर्ण हयात पोलिस विभागात गेली आहे. तू पोलिसात तक्रार केली तरी आम्ही सर्व सांभाळून घेऊ असा दावा करत पराग कुटुंबीयांनी पीडितेला मारहाण केली. दुर्व्यवहार केला.

 

सर्व प्रकारामुळे पीडित मुलीची मानसिक अवस्था ढासळली. मित्राने दगा केली, बदनामीही झाली या नैराश्यातून ती आत्महत्येचा विचार करू लागली. मात्र, ओलावा नावाच्या एनजीओने तिची समजूत काढत तिच्यात न्यायासाठी लढण्याचा विश्वास जागृत केला.

 

पीडित तरुणी सामाजिक संस्थांच्या मदतीने पोलिस तक्रार करेल आणि आपले कुकर्म सर्वांसमोर येईल हे लक्षात आल्यानंतर आरोपी पराग राऊतने पीडितेच्या मागे गुंडांचा ससेमीरा लावला. आरोपीने पाठवलेले गुंड पीडितेला नागपूर शहरात ठिकठिकाणी गाठून धमकाऊ लागले.

 

17 जून रोजी रहाटे कॉलोनीत बुलेटवर आलेल्या अज्ञात गुंडानी तिला आडवत बंदुकीच्या धाक दाखविला आणि पोलिसात तक्रार न करण्याची ताकीद दिली. 25 जून रोजी पुन्हा मनिषनगर परिसरात गुंडानी तिचा पाठलाग करत धमकावले. पिडितेने दोन्ही वेळा धंतोली आणि सोनेगाव पोलिस स्थानकात जाऊंन तक्रार दिली.

 

तिच्यावर बलात्कार झाला आहे आणि त्याची तक्रार तिने देऊ नये यासाठी तिला धमकावले जात असल्याची माहितीही पोलिसांना दिली. मात्र, धंतोली आणि सोनेगाव पोलिस स्थानकात फक्त धमकी दिल्याची तक्रार नोंदविली आणि बलात्काराची तक्रार नोंद्वायला गिट्टिखदान पोलिस स्थानकात जाण्याचा सल्ला दिला. मुळात पीडित महिला कोणत्याही पोलीस स्थानकात तक्रार देऊ शकते. पोलिसांनी ती संबंधित पोलीस स्थानकात कळवावी असे नियम आहे.

 

सामाजिक संस्थांच्या मदतीने पीडित तरुणी रितसर लेखी अर्जासह 29, 30 जून आणि 1 जुलै रोजी सतत तीन दिवस गिट्टीखदान पोलिस स्थानकात गेली. मात्र, या 3 दिवसाचे तिचे अनुभव आणि पोलिसांच्या व्यवहाराबद्दल तिचे अनुभवही वाईट होता.

 

पीडित तरुणीचा आरोप आहे की तिची न्यायासाठीची ही लढाई एका पोलिस कुटुंबातील युवका विरोधात आहे हे माहित असलेल्या पोलिसांनी पावलोपावली तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आरोप लागलेल्या युवकाच्या कुटुंबासोबत समझोता करुन घे. पैसे घेऊन घे असे दबाव आणले. मात्र, पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळले आहे.

 

दरम्यान, पीडितेसोबत काल घडलेली घटना तर अंगावर शहारे आणणारी आहे. काल संध्याकाळी ती खामला परिसरात भाजी घेत असताना स्विफ्ट कार ने आलेल्या तीन गुंडानी तिच्या कपाळावर बंदूक ठेऊन तिला केलेली तक्रार मागे घेण्याचे किंवा परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहण्याची धमकी दिली. सामाजिक कार्यकर्त्यांनी काल तिला धाडस देत प्रतापनगर पोलिस स्थानकात सुरक्षित नेले आणि पुन्हा धमकी मिळाल्याची तक्रार दिली.

 

एवढेच नाही तर या सर्व प्रकाराची तक्रार करायला पीडित युवती १६ जुलै रोजी पोलिस आयुक्त कार्यालयात ही गेली होती. मात्र, त्या ठिकाणी उपस्थित वर्दीधारी पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला डीसीपीकडे जाण्यास सांगितले. पोलीस आयुक्त सध्या कार्यालयात नाहीत असे सांगून तिची दिशाभूल केली. त्यामुळे बलात्कार झाल्यानंतर आधीच नैराश्यात गेलेल्या या तरुणीला न्यायाची लढाई लढताना येणारे अनुभव पावलोपावली तिच्यावर अत्याचार होण्यासारखेच आहे.