सोलापूर : दक्षिण भारतातून देवदर्शन करुन परतत असताना झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यात आळंद येथे हा झाला आहे. सर्वजण दक्षिण सोलापूरमधील चिंचपूर येथील रहिवाशी आहेत.


श्रावणनिमित्त दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर येथील चडचण कुटुंबीय दक्षिण भारतात देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करुन परत येत असताना कलबुर्गी (गुलबर्गा) जिल्ह्यातील आळंद येथे त्यांच्या गाडीला अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच आळंद पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.


या अपघातामध्ये संजय अशोक चडचण, राणी संजय चडचण, श्रेयस संजय चडचण, भाग्यश्री आळगी यांचा मृत्यू झाला आहे. तर शिवराज संजय चडचण, भीमाशंकर आळगी, गौरेश हत्तरसंग हे जखमी आहेत. भीमाशंकर आळगी आणि भाग्यश्री आळगी यांचं गेल्या महिन्यातच लग्न झालं होतं. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर चिंचपूर गावावर शोककळा पसरली.