अपघातात जखमी झालेल्या काही साईभक्तांना सिन्नर येथील रुग्णालयात तर काहींना शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेतील जखमींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.
सिन्नर तालुक्यातील वावी परिसरात मुबंईतील कांदिवली समतानगर येथील साईराम पालखी शिर्डीकडे पायी चालली होती. रात्री 8 वाजेच्या सुमारास सिन्नर-शिर्डी रस्त्यावर देवपूर फाट्याच्यापुढे स्विफ्ट कार क्रमांक एमएच 15 सीटी 9101 भरधाव वेगाने पालखीत घुसली.
कार भरधाव वेगाने असल्याने 20 ते 22 साईभक्तांना कारने जोराची धडक दिली. या धडकेने काही भाविक रस्त्याच्या कडेला शेतात फेकले गेले. या घटनेत दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे.
कार चालकाला समोरून येणाऱ्या वाहनांच्या लाईटमुळे काहीच न दिसल्याने कार सरळ पालखीतील भाविकांना चिरडत गेली. पालखीसोबत 25 फुटी देखावा असलेल्या रथालाही कारने जोरदार धडक दिली. या अपघातानंतर क्रेन आणून वाहतूक सुरळीत केली गेली. जखमींना स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी मदतकार्य करत तात्काळ शिर्डी आणि सिन्नर येथे उपचारासाठी पाठविले. या अपघातानंतर शिर्डी येथे पालखीतील भाविकांचा आक्रोश पहावयास मिळत आहे.