ABP News C Voter Survey On NCP Crisis:  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. राष्ट्र्वादीतील बंडानंतर शरद पवार राज्याचा दौरा करणार आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर आपली निवड झाल्याचे सांगत अजित पवार यांनी पक्षावर दावा केला आहे. राष्ट्रवादीतील फुटीवर एबीपी न्यूज आणि सी व्होटरने एक सर्वे केला आहे. यातील निष्कर्ष आश्चर्यजनक आहेत. 


शरद पवार या वयात पक्षाला उभारी देतील?


शरद पवार महाराष्ट्रात फिरून पुन्हा पक्ष उभारू शकतात का, असा प्रश्न या सर्वेक्षणात विचारण्यात आला होता. वयाच्या 83 व्या वर्षी शरद पवारांना असे करणे शक्य होईल का,असे तुम्हाला वाटते का? यावर 57 टक्के लोकांनी 'हो' तर 37 टक्के लोकांनी 'नाही' असे उत्तर दिले आहे. उर्वरित 6 टक्के लोकांनी 'माहित नाही' असे उत्तर दिले. 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा?


एबीपी न्यूज-सी व्होटरच्या या सर्वेत राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा अध्यक्ष कोण असा प्रश्न विचारण्यात आला होता. सर्वेत सहभागी झालेल्या 66 
टक्के लोकांनी शरद पवार हेच पक्षाचे खरे अध्यक्ष असल्याचा कौल दिला. तर, 25 टक्के लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस हा अजित पवारांचा पक्ष असल्याचे वाटते. 9 टक्के लोकांनी माहिती नाही, असे उत्तर दिले. 


अजित पवार यांच्या बंडामागे पवारांचा हात?


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. अजित पवार यांच्यासह पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी पवारांची साथ सोडली. अजित पवार यांनी पक्षावर दावा केला असून स्वत: राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा केला आहे.  


अजित पवार यांचे बंड ही शरद पवारांचीच खेळी आहे, अशी चर्चा सुरू झाली होती. त्याबाबतही सर्वेक्षणात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. अजित पवारांनी केलेल्या बंडामागे त्यामागे शरद पवार आहेत का? असा प्रश्न सर्वेत विचारण्यात आला होता.  प्रश्नावर आश्चर्यकारक उत्तरं मिळाली आहेत. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 37 टक्के लोकांनी  अजित पवारांच्या या खेळामागे शरद पवार असल्याचे सांगितले. तर 49 टक्के लोकांनी शरद पवार यांचा हात नसल्याचे स्पष्ट केले. तर,14 टक्के लोकांनी माहिती नाही असे उत्तर दिले. 


सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी हे सर्वेक्षण केले आहे. महाराष्ट्रात 1 हजार 790 लोकांशी चर्चा करण्यात आली. गुरुवारी आणि शुक्रवारी हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेतील निष्कर्ष हा केवळ लोकांशी झालेल्या संवादावर आणि त्यांनी व्यक्त केलेल्या मतांवर आधारित असतात. सर्वेक्षणातील त्रुटीचे मार्जिन अधिक उणे 3 ते अधिक 5 टक्के आहे. याला एबीपी न्यूज जबाबदार नाही.


इतर संबंधित बातम्या: