चिपळूण : मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण नजीकचा परशुराम घाट सध्या खचतोय आणि ढासळतोय याचं याच धोकादायक वास्तव एबपी माझाने समोर आणले. आता या वृत्ताची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली असून परशुराम घाटाचे रखडलेले काम तातडीने सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान एबीपी माझाच्या बातमीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने तीन किमीच्या परशुराम घाटाचे रखडलेले काम त्वरित सुरू करा. तसेच लागल्यास पोलिस बळाचा वापर करा असे आदेश देण्यात आले आहे. या आदेशाचे पत्र जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षक यांना पाठवण्यात आले आहे.
मुंबई गोवा महामार्ग कोकणच्या नागमोडी वळणाचा. डोंगरदऱ्यातून तयार केलेला हा महामार्ग. काही वर्षांपूर्वी याच महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. त्यानंतर अनेक ठिकाणी अडचणी आल्या. त्यापैकी एक म्हणजे चिपळूणचा परशुराम घाट. या घाटात चौपदरीकरणासाठी भूसंपादन करण्यात आले. त्यानंतर त्या जमिनीचा मोबदला जाहीर करण्यात आला. सध्या मोबदल्यावरुन परशुराम देवस्थान, कूळ, गावकरी यांच्यात वाद आहेत.

जमीनदारांच्या मोबदल्याचा गुंता अजूनही न सुटल्याने चौपदरीकरण रखडलेले आहे. पावसाळ्यात या ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. त्यातच आता काही ठिकाणी रस्ता खचू लागल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. विशेष म्हणजे प्रामुख्याने हा भाग चिपळूण विभागाकडे न येता तो महाड राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे येतो. कल्याण टोलवेज कंपनी मार्फत हे काम केले जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी एकदा पोलिस फौजफाट्यात काम सुरु करण्याचा प्रयत्न झाला होता.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्त्वाच्या बातम्या :