मुंबई : दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परिक्षेवेळी विद्यार्थ्यांसाठी लादण्यात आलेली नवी नियमावली म्हणजे तुघलकी निर्णय असून निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि आमदार कपिल पाटील यांनी या नियमावरुन शिक्षणमंत्री विनोद तावडेंना लक्ष्य केलं आहे.


दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी 1 मिनिटही उशीर झाल्यास परीक्षेला मुकावं लागणार आहे. तसंच परीक्षा संपेपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्येच बसून राहावं लागणार आहे. याच नियमांवरुन आता सरकारवर राजकीय टीकेची झोड उठू लागली आहे.

दरम्यान दहावी आणि बारावी बोर्डाची शैक्षणिक गुणवत्ता टिकवण्यासाठी एखादी बेस्ट बस उशिरा आली तर.. असं म्हणून युवा नेत्याने नियमांमध्ये बदलाची मागणी करणं चुकीचं आहे. गुणवत्ता टिकवण्यावर आमचा भर आहे असं म्हणत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आदित्य ठाकरेंच्या मागणीचा समाचार घेतला आहे. तसंच 11 वाजून 1 मिनिटांनी येणारा विद्यार्थी एक नाही तर 31 मिनिटं उशीरा येतो असं स्पष्टीकरण देत त्याला वर्गात जाता येणार नाही याचाही पुनरुच्चार केला आहे.

एखाद्या चांगल्या विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये म्हणून 40 मोकाट मुलांना संधी देण्याची मागणी आम्ही मान्य करू शकत नाही. असंही विनोद तावडे पुढे म्हणाले आहेत.

तसंच दहावी-बारावी परीक्षेच्या वेळासंदर्भात जर 11 चा पेपर असेल तर 10.30 पोहोचा असं विद्यार्थ्यांना सांगितले जातं. आणि 10.45 वाजता प्रवेश दिला जातो. 11 वाजण्याच्या 10 मिनिट आधी पेपर दिला जातो. तेव्हा जर विद्यार्थी एक मिनिट उशिरा येत असेल तर त्याला 31 मिनिटे उशीर झालेला असतो, असं शिक्षणमंत्री तावडेंनी आपल्या निर्णयाचं स्पष्टीकरण दिलं आहे.  गेल्या काही दिवसात व्हाट्सअपद्वारे पेपर फुटल्याचे प्रकार घडले आहेत,  त्यामुळे हा निर्णय घेतल्याचंही तावडेंनी स्पष्ट केलं आहे.