मुंबई : राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना संधी मिळाली, मात्र त्या जागेवरून आदित्य ठाकरे यांच्या मनात सल कायम असल्याचं दिसून येत आहे. मविआमधील सर्वात मोठा पक्ष असतानाही तिसऱ्या पक्षाला संधी मिळाली, फक्त वाद नको होता म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या निर्णयाला संमती दिल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. आता आपण जो दावा करत होतो तो योग्यच होता, यापुढे 2029 पर्यंत पुन्हा संधी मिळणार नाही असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
राज्यातील राज्यसभेच्या सात जागांपैकी एका जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार खासदार म्हणून जाणार होता. या जागेसाठी आदित्य ठाकरे आग्रही होते. त्याचवेळी शरद पवारांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला आणि नंतर महाविकास आघाडीने त्यांच्याच नावाला पसंती दिली. यावरून आदित्य ठाकरे नाराज असल्याची चर्चा होती.
Aaditya Thackeray On Rajya Sabha Election : आदित्य ठाकरेंची सल कायम
राज्यसभेच्या जागेवर दावा असतानाही आपल्याला ती जागा राष्ट्रवादीला सोडावी लागली याची सल आदित्य ठाकरे यांच्या मनात कायम असल्याचं त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे. माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला आताची संधी गेल्यानंतर कदाचित 2029 पर्यंत पुन्हा संधी मिळणार नाही. कारण मविआमध्ये आम्ही काही नियम पाळत होतो. त्यानुसार सर्वात मोठ्या पक्षाला पहिला संधी मिळायची. आता सर्वात जास्त आमदार असलेला पक्ष आमचा, पण आता संधी तिसऱ्या नंबरच्या पक्षाला संधी मिळाली.
आदित्य ठाकरे म्हणाले की, आताची संधी गेली, यानंतर 2028 साली काँग्रेस दावा करू शकेल. आमच्यातीलही काही इच्छुक असतील तर ते दावा करतील. या सगळ्या गोंधळामध्ये मतांचा कोटा हा जास्त वाढत असल्याचं दिसतंय. त्यामुळे मी जे काही सांगत होतो ते निस्वार्थीपणे सांगत होतो. ती भूमिका माझ्या पक्षासाठी होती.
Aditya Thackeray Reaction : वाद नको म्हणून संमती दिली
आदित्य ठाकरे म्हणाले की, "राज्यसभेचा जो काही निर्णय झाला तो इंडिया आघाडी म्हणून झाला. आधी काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने दावा केला होता, आम्हीही दावा केला होता. मातोश्रीवर यासंदर्भात बैठक झाली. त्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकमत झालं, मग आम्हीही त्याला संमती दिली. कारण आम्हाला यामध्ये कुठेही वाद नको होता."
ही बातमी वाचा:
