राजापूर : उन्हाळा सुरु झाल्यानंतर सुर्याचा दाह अनेकांच्या डोक्यात हा उन्हाळा संपायचा तरी कधी अशा कैक विचारांचा काहूर माजवतो तसाच काहूर आणखी एका गोष्टीमुळंही पाहायला मिळतो. पण, हा काहूर मात्र हवाहवासा असतो. कारण, सर्वांनाच या मोसमात प्रतीक्षा लागून राहिलेली असते ती म्हणजे फळांच्या राजाची, अर्थात हापूस आंब्याची.


पहिलं फळ बाजारात येण्यापासून ते अगदी या फळाची विक्री, दरांमध्ये होणारे चढउतार या साऱ्यावरच अनेकजण लक्ष ठेवून असतात. कारण, हा फळांचा राजा आपल्या घरी कधी येतो, याचीच उत्सुकताही सर्वांना लागलेली असते. याच साऱ्या उत्सुकतेच्या वातावरणात हापूस आंब्यानं दरांचा एक वेगळाच विक्रम रचला आहे.


राजापूरमधील बाबू अवसरे या शेतकऱ्याच्या 5 डझन हापूस आंब्याच्या पेटीला तब्बल 1 लाख 8 हजारांचा विक्रमी भाव मिळाला आहे. कोकणातील हापूस आंब्याला जगभरातील बाजारपेठ थेट विक्रीसाठी उपलब्ध करून देत शेतकऱ्यांना अधिकाधिक स्वावलंबी बनवण्यासाठी 'ग्लोबल कोकण' आणि 'मायको' या देशातील पहिल्याच मँगोटेक प्लॅटफॉर्मद्वारे पुढाकार घेण्यात आला आहे.


प्रशंसनीय! भारतीय क्रिकेट संघाकडून आणखी एका यशाला गवसणी


कोकणातील 10 आंबा बागायतदारांच्या मुहूर्ताच्या आंबा पेटींचा लिलावाचा कार्यक्रम 5 मार्च रोजी अंधेरीतील मॅरिएट येथे सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. शेतकऱ्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढवणारी 'मायको' ब्रँडची पहिली पेटी उद्योजक आणि सेंट अग्नेलो व्हीएनसीटी व्हेंचरच्या राजेश अथायडे यांनी 1 लाख 8 हजार रुपये अशी विक्रमी किंमत देऊन घेतली. जवळपास मागील 100 वर्षांमध्ये हापूस आंब्याच्या पेटीला इतकी मिळाली नव्हती. हा आजवरचा सर्वात मोठा विक्रम आहे. त्यामुळं आता येत्या काळात आंब्याच्या दरांकडे विक्रेते आणि खरेदीदारांचं बारीक लक्ष असणार आहे हे नक्की.