पालघर : पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना संक्रमण झपाट्याने वाढले. जव्हारमध्ये ही कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला असून तो खाजगी दवाखान्याच्या नर्स यांच्या संपर्कातील तथा व्यवस्थापकाच्या लग्न सोहळ्यामुळेच वाढला असून, केळघर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने फिर्याद नोंदविली आहे. आपत्ती व्यवस्थापन नियमांचे भंग करून लग्न सोहळ्यात 50 पेक्षा अधिक लोकांचा जमाव जमवल्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला असल्यामुळे नवरदेव मच्छिंद्र कोरडे सह अन्य चार व्यक्तीवर जव्हार पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


खाजगी दवाखान्यातील व्यवस्थापक कोरडे याचा लग्न सोहळा 11 जून रोजी केळघर येथे आयोजित केला होता. सध्या कोरोनामुळे लग्न सोहळ्यात 50 पेक्षा जास्त व्यक्तींचा सहभाग होऊ नये असा निर्बंध शासनाकडून लावण्यात आलेला आहे. तरीही स्वॅबचे नमुने घेतलेले असताना, अहवाल अप्राप्त असताना त्यांनी लग्न सोहळा पार पाडला यात 250 ते 300 लोकं सहभागी झाले होते. त्यामुळे मनाई आदेशाचा भंग करुन, विनापरवानगी लग्न समारंभाचे आयोजन केले. विनापरवानगी 50 पेक्षा जास्त लोक हजर होते. तसेच हजर असलेल्या लोकांपैकी बऱ्याच लोकांनी त्यांच्या तोंडावर मास्क अथवा रुमाल लावला बांधला नव्हता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोना कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव झाला म्हणून भा.दं.वि. कलम 188 अन्वये भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, 13 मार्च 2020 पासून लागू करण्यात आलेल्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 अ व 135 प्रमाणे नवरदेव व त्यांच्या कुटुंबातील इतर चार अशा 5 व्यक्तींवर जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान तो एका जव्हारच्या एस.टी. महामंडळाच्या चालकाच्या संपर्कात आला होता. त्यामुळे त्याचे व इतर पाच व्यक्तींचे स्वॅबचे नमुने 10 जून रोजी तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र स्वॅबचे नमुने पाठविले असताना त्यांना शासकीय विलगिकरण कक्षात असणे बंधनकारक होते. मात्र हा कोणाच्या आशीर्वादाने बाहेर फिरत होता, त्यांचे लग्न सोहळाही पार पडला आणि न होणारी अघटीत घटना घडली असून, जव्हार तालुक्यात 39 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली. आरोग्याशी निगडित असेलेल्या व्यक्तीकडून अशाप्रकारे हलगर्जीपणा होत असल्याने व संबंधित खाजगी दवाखान्यातील उच्चशिक्षित डॉक्टरांकडून स्वाबचे नमुने तपासणीसाठी गेले असताना दवाखाना सुरू ठेऊन रुग्ण तपासणे हे कितपत योग्य आहे, त्या डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. दरम्यान, लॉकडाऊन काळात पहिलेच मेटाकुटीला आलेला व्यापारी वर्गाला पुन्हा सलग पाच दिवस दुकाने बंद ठेवावी लागत असल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.