उस्मानाबाद : 93 वं अखिल भारतीय साहित्य संमेलनउस्मानाबादेत पार पडणार आहे. त्यामुळे मराठवाड्याचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी व संतश्रेष्ठ गोरोबाकाकांच्या वास्तव्याने पावन झालेल्या उस्मानाबादमध्ये सारस्वतांचा मेळा पाहायला मिळणार आहे.


93 वं साहित्य संमेलनासाठी बुलडाणा, लातूर, नाशिक आणि उस्मानाबाद याठिकाणांना विचार सुरु होता. साहित्य संमेलन महामंडळाच्या अध्याक्षा अरुणा ढेरे यांच्यासह 19 जणांनी एकमताने सहमती दिल्याने अखेर उस्मानाबाद येथे आता साहित्य संमेलन पार पडणार आहे.


साहित्य महामंडळाचे कौतिकराव ठाले-पाटील यांनी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये पार पडणार असल्याची घोषणा केली.  साहित्य संमेलन कधी होणार याची तारीख अद्याप निश्चित नाही. मात्र पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये साहित्य संमेलन पार पडणार आहे.


उस्मानाबाद मध्ये साहित्य संमेलन व्हावं यासाठी मागील पाच वर्षांपासून प्रयत्न सुरु होते. अखेर यावर्षी या प्रयत्नांना यश मिळालं आहे. त्यामुळे उस्मानाबादकरांना पुढच्या वर्षीच्या सुरुवातील साहित्याची मेजवानी मिळणार आहे.