सिंधुदुर्ग : मालवण तालुक्यातील वायरी समुद्र किनाऱ्यावर बुडून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळी 11.30 वाजता घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. बेळगावमधील मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजचे 47 विद्यार्थी सहलीसाठी मालवणला आले होते. त्यातील काही जण आज सकाळी पोहण्यासाठी वायरी येथील समुद्रात उतरले. यातील 11 जण बुडाले. त्यांना वाचविण्यासाठी किनाऱ्यावरील लोकांनी आरडाओरडा केला. 11 पैकी तिघांना वाचवण्यात यश आले आहे. या दुर्घटनेच्या धक्क्याने शिक्षिका बेशुद्ध पडल्याची माहिती मिळते आहे. या भागातील समुद्र धोकादायक आहे. 'खोल पाण्यात जाऊ नये' असे फलकही येथे लावले आहेत. बुडालेल्या तरुणांना वाचविण्यासाठी स्थानिकांनी धाव घेतली. त्यातील तिघांना वाचविण्यात त्यांना यश आले. या तिघांना उपचारासाठी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तिघांना वाचवण्यात यश :
  1. संकेत गाडवी
  2. अनिता हानली
  3. आकांक्षा घाडगे
यात दोन तरुणी आणि एका तरुणाचा समावेश आहे. अन्य आठ जणांचा मात्र बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन तरुणी आणि सहा तरुणांचा समावेश आहे. मृतांची नावं
  1. मुजमीन अनिकेत
  2. किरण खांडेकर
  3. आरती चव्हाण
  4. अवधूत
  5. नितीन मुत्नाडकर
  6. करुणा बेर्डे
  7. माया कोले
  8. प्रा. महेश
घटनेची माहिती मिळताच सिंधुदुर्ग पोलिस वायरी समुद्र किनाऱ्यावर पोहोचले. त्यानंतर पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.