Unseasonal Rain : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृह (Sahyadri Guest House) इथे ही भेट झाली. अवकाळी पावसाच्या मुद्द्यावर ही भेट झाली. साधारण 50 मिनिटं ही बैठक झाली. या बैठकीतील विशेष बाब म्हणजे अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार विशेष पॅकेजची घोषणा करणार असल्याची शक्यता आहे.


दरम्यान बैठक संपवून अजित पवार तीनच्या सुमारास सह्याद्री अतिथीगृहातून बाहेर पडले. महत्त्वाचं म्हणजे अजित पवार बैठकीनंतर मागच्या गेटने निघाले. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांच्या भेटीची सध्या जोरदार चर्चा आहे.


सरकार मदतीच्या विशेष पॅकेजची घोषणा करणार?


दरम्यान अजित पवार यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच्या बैठकीत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकर भरपाई मिळावी याबाबत सकारात्मक चर्चा झाली. तसंच एका आठवड्यात सर्व पंचनामे केले जातील आणि लवकरच मोबदला दिला जाईल असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे एका विशेष मदतीच्या पॅकेजची घोषणा सरकार करणार असल्याचे बैठकीत ठरल्याची माहिती मिळत आहे.


अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rains) राज्यातील शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची (Farmers) उभी पिकं आडवी झाली आहेत. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी अजित पवार यांनी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दुपारी दोन वाजता ते सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले. तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास 50 मिनिटं चर्चा झाली. यावेळी अजित पवार यांनी विविध मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना दिल्याचं समजतं.



नुकसानग्रस्तांना हेक्टरी 50 हजार ते एक लाखाची मदत द्या : अजित पवार


अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. केळी, द्राक्ष, आंबा संत्रा या फळबागांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला होता. तर हरभरा, गहू, ज्वारी भाजपाला पिकांचेही मोठे नुकसान यामध्ये झाले होते. या नुकसानीमुळं बळीराजा पुरता कोलमडला आहे. त्याला दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत मदत जाहीर करावी, अशी अजित पवार यांनी केली आपल्या निवेदनात केली आहे.


नारायण राणे देखील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला


दरम्यान अजित पवार यांच्यानंतर भाजपचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचीही बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. अवकाळी पावसाने आंब्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याची नुकसान भरपाई लवकर मिळावी याबाबत ही बैठक झाली. तसेच येणाऱ्या काळात आंबा महोत्सव मोठ्या प्रमाणात भरवला जावा, ज्यामुळे आंबा शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई होण्यास मदत होईल, अशी मागणी राणे यांनी केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.